Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सावरकरांच्या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य अतिशय दुर्दैवी- छगन भुजबळ

नाशिक :- सावरकरांच्या कार्यक्रमासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

आज नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. ही जयंती साजरी करत असताना महाराष्ट्रात सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविले. याबाबत निषेध व्यक्त करत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सदनात झालेल्या विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमाला आमचा विरोध नाही. मात्र या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती हे अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, ज्या सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी शेणगोळे सहन करून मोठा त्याग केला व ज्या अहिल्यादेवींनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला, त्यांचेच पुतळे या सरकारला सहन होईना. या लोकांच्या बुद्धीची कीव येते अशी टीका त्यांनी केली. तसेच आमचा सावरकरांच्या कार्यक्रमास विरोध नाही, पण महापुरुषांचे पुतळे हटवून तुम्ही दाखविलेल्या हीन दर्जाच्या मानसिकतेचं नवल वाटतंय असे सांगत याबाबत निषेध व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading