सज्जनतेने सामाजिक काम करणा-यांचे डॉ गिरीश गांधी हे महामेरू – सुशीलकुमार शिंदे
पुणे : समाजाची वेदना घेऊन सज्जनतेने काम करणाऱ्यांचे महामेरू म्हणजे डॉ. गिरीश गांधी होय, अशी भावना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेच्या वतीने जेष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ.गिरीश गांधी यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. येथील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला स्टॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक विखे पाटील, गोव्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप, उद्योजक विठ्ठल शेठ मणियार ,संवाद चे सुनील महाजन, संयोजक व साहित्य प्रसारणी संस्थेचे अध्यक्ष सचिन ईटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महात्मा फुले पगडी, मानपत्र ,शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन डॉ. गिरीश गांधी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
श्री शिंदे म्हणाले, सेवा हेच सत्कर्म मानत नागपूरमध्ये गांधी यांनी ८० संस्थांची उभारणी केली असून समाजवादी समाज रचनेचे कार्य करणारे ते दिशादर्शक सामाजिक कार्यकर्ते असल्याचे सांगितले.
तर ,सामाजिक न्याय ही एक प्रक्रिया असून तेथे काम करणाऱ्यांचा न्यायाधीश होण्याचा अधिकार समतेचा विचार घेऊन चालणाऱ्या डॉ. गिरीश गांधींकडे असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
यावेळी संदीप वासलेकर यांनी आपल्या भाषणात, समाजाची नौका अर्थात सुकाणू हे सामंजस्य, सन्मान आणि सदसद्विवेकबुद्धी यांचा वापर करूनच पुढे जाऊ शकते त्यामुळे युवा पिढीने गिरीश गांधी यांच्या आयुष्याकडे पुस्तक म्हणून पाहण्याची गरज असून समाजाचा दिवा म्हणून त्यांना आता स्थान प्राप्त झाले असल्याचे सांगितले. चारित्र्य घडविणारे नेते, सहकारी व मार्गदर्शक मला लाभल्याने माझे जीवन फुलले. भ्रष्टाचार म्हणजे आईशी केलेला व्याभिचार आणि लाचारीचे जगणं म्हणजे आत्महत्या करणे होय ही माझ्या जीवनाची रेषा म्हणून मी निश्चित केली. त्यामुळे धर्माच्या नावावर फार काळ कुठलेच राज्य व राष्ट्र स्थिरावू शकत नसून धर्म ही अफूची गोळी असल्याचे प्रतिपादन डॉ गिरीश गांधी यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले.
याप्रसंगी रमाकांत खलप, डॉ. अशोक विखे पाटील यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन इटकर यांनी केले तर उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
