Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

नवकल्पना, स्टार्टअप संस्कृतीला प्राधान्य द्यावे : विखे पाटील

पुणे : “नव्या शैक्षणिक धोरणात नवकल्पना, स्टार्टअप संस्कृती, कौशल्य विकास यावर भर देण्यात आला आहे. ज्ञानदानाची ११४ वर्षांची जाज्वल्य परंपरा असलेल्या पुणे विद्यार्थी गृहाने नव्या गोष्टी राबविण्याला, तसेच कार्यक्षम, कृतिशील व कार्यकुशल पिढी घडवण्याला प्राधान्य द्यावे,” असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री व पुणे विद्यार्थी गृहाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पुणे विद्यार्थी गृहाच्या ११४ व्या वर्धापन दिनानिमित्त, तसेच संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शताब्दी पूर्ती निमित्त स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात विखे पाटील बोलत होते. संस्थेचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी श्रीधर पाटणकर अध्यक्षस्थानी होते. प्रसंगी नियामक मंडळाच्या पौर्णिमा लिखिते, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, उपकार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कार्यवाह प्रा. डॉ. राजेंद्र कांबळे, कोषाध्यक्ष आनंद कुलकर्णी, कुलसचिव अमोल जोशी, संचालक संजय गुंजाळ, कृष्णाजी कुलकर्णी, राजेंद्र बोऱ्हाडे, राजेंद्र कडुस्कर, रमेश कुलकर्णी यांच्यासह सल्लागार व कार्यकारी मंडळाचे सदस्य, माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतनक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून स्थापन झालेल्या पुणे विद्यार्थी गृहाच्या वाटचालीत अनेक दानशूरांचे योगदान, अनेकांचा त्याग यामुळे गरीब मुलांच्या शिक्षणासाठी गेली ११४ वर्षे हा ज्ञानयज्ञ तेवत राहिला आहे. संस्थेने अनेकांना घडवले आहे. मूलभूत ध्येयापासून विचलित न होता कालानुरूप बदल करत संस्थेने प्रगतीचे अनेक टप्पे गाठले, ही समाधानाची बाब आहे.”

सुनील रेडेकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, संस्थेच्या सर्व विभागाची कामगिरी उल्लेखनीय होत आहे. अभियांत्रिकी, मुद्रण महाविद्यालयात विद्यार्थ्यांकड़ून अनेक तंत्राविष्कार पाहायला मिळत आहे. नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या शैक्षणिक प्रदर्शनात संस्थेला गौरविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शताब्दी पूर्तीनिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन झाले. यामध्ये विद्यालयाच्या शंभर वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच संस्थेच्या विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सकाळी संस्थेच्या आवारातील धनुर्धारी श्रीराम मंदिरात रेडेकर यांच्या हस्ते शास्त्रोक्त पूजा झाली. श्रीधर पाटणकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रा. माणिक जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. राजेंद्र कांबळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading