सत्तेसाठी हापापलेल्या लोकांना सुप्रीम कोर्टाने उघडं नागडं केलं – उद्धव ठाकरे
मुंबई : देशात लोकशाहीची हत्या होतेय की काय असे चित्र सध्या देशात आहे. विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा आमचा प्रयत्न आहे, यामुळे आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राजद नेते तेजस्वी यादव माझ्या भेटीला आले होते, आजपासून लढाईला नव्याने सुरुवात झाली आहे असे नमूद करत सत्तेसाठी हापापलेल्या लोकांना सुप्रीम कोर्टाने उघडं नागडं केलं असे मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, बंडखोर गटाने नेमलेला प्रतोद सुप्रीम कोर्टाने अवैध असल्याचे सांगितले हा आमचा विजय आहे. विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकर निर्णय घ्यावा असे सांगत माझ्यावर गद्दार लोकांनी अविश्वास दाखवावा ही बाब मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटली नाही म्हणून मी पदाचा राजीनामा दिल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच नैतिकतेच्या मुद्द्यावर शिंदे – फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाने फुटीर लोकांचा व्हीप नाकारला आहे यामुळे आमच्या पक्षाचाच व्हीप चालणार आहे असेही ठाकरे यांनी नमूद केले. यामुळे निवडणूक आयोग आमचा धनुष्यबाण आणि शिवसेना नाव हिरावून घेऊ शकत नाही असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.