बारसु बद्दलची, नाणार बद्दलची माझी भूमिका ही तेथील लोकांची भूमिका! – उद्धव ठाकरे
मुंबई : बारसु वरुन रान पेटवलं जातयं, उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं होतं…. हो दिलं होतं, मी कुठे नाही म्हणतोय. पण मी मुख्यमंत्री होतो तेंव्हा पत्र दिलं होतं तर अडीच वर्षात पोलीसांकरवी का जबरदस्ती केली नव्हती? बारसु बद्दलची, नाणार बद्दलची माझी भूमिका ही तेथील लोकांची भूमिका! आहे असे ठणकावत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पायक्षांचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. गुरुवारी भारतीय कामगार सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते.
याप्रसंगी बोलताना ठाकरे म्हणाले, शिवसेनेस 56 वर्षे झाली, भारतीय कामगार सेनेस 55 वर्षे… 55 वर्षाची होऊन देखील आपली भारतीय कामगार सेना अजुन तरुण आहे! दत्ताजी साळवींसारखी निष्ठावंत लोक काही घेण्यासाठी आलीच नव्हती, देण्यासाठी आली होती. मुलुखमैदानी तोफ कशाला म्हणतात हे दत्ताजींची भाषणे ज्यांनी ऐकली त्यांनाच समजु शकेल. त्या काळी युनियन तुझी की माझी यावरुन मारामारी होत असे… आता युनियनच्या मारामार्या संपल्या कारण सरकारच युनियन संपवायला लागले. हा पायंडा घातक आहे. सरकारच अस आहे की कॉन्ट्रॅक्टरचे लाड करायचे आणि प्रसाद खायचा अशी टीका ठाकरे यांनी केली.
प्रत्येकाचे दिवस असतात, आपले दिवस गेलेत अस मी म्हणूच शकत नाही, आणायचेच! त्या वेळेला आपण जो काही प्रसाद देऊ, तो त्यांना आयुष्यभर लक्षात राहिल. आता कामगार दिन येत आहे, ‘जय जवान, जय किसान’ ला शिवसेनाप्रमुखांनी जोड दिली होती, ‘जय कामगार’! कारण तुम्हीं देश घडवत असता…. मोर्चे निघतात, परंतु सरकार संवेदनाशील असायला हवे.
युतीचे सरकार असताना शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, मोर्चे येतील परंतु मोर्चे आल्यावर ते पोलिसांकरवी अडवायचे नाहीत, ज्या खात्याबद्दल मोर्चा असेल त्या खात्याचा मंत्री 6 व्या मजल्यावरुन खाली उतरून मोर्चास सामोरा जायला पाहिजे. ही संवेदनाशीलता राहिली कुठे ?
अडीच वर्षात आपण 25 मोठे उद्योग आणि अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपण आणत होतो, काही आणली. त्यातील बरेचसे यांनी डोळ्यादेखत पळवुन नेले, ओरबाडुन नेले, तरी शेपट्या घालुन आत बसणारे बाळासाहेबांचे विचार दाखवत आहेत? हे बाळासाहेबांचे विचार? ज्या शिवसेनेचा जन्मच मुळी भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी झाला त्या भूमीपुत्रांवर अन्याय करुन येऊ घातलेले उद्योगधंदे बाजुला स्वत:च्या राज्यात नेत आहेत तरी शेपट्या यांच्या आत! हे कसले बाळासाहेबांचे विचार?
येताना माहिती मिळाली ती खरी का खोटी पहा, सध्याचे निरुद्योगी मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तैवानच्या कंपनीसोबत एमओयु केला होता, 2300 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार म्हणून फोटो काढले, ती जोडे बनवणारी कंपनी देखील तामिळनाडूत गेली, हे बसलेत जोडे पुसत!
फक्त जोडे पुसण्याची लायकी असलेली लोक राज्य करत आहेत, महाराष्ट्राच होणार काय?
कामगारांना किती प्रकारे छळणार? मशीन वेगळी आणि ती देखील बिघडते. जीतीजागती माणसं, त्यांचा माणूस म्हणून तुम्हीं कधी विचार करणार की नाही? की नुसतच कामगार म्हणून वाट्टेल तस त्यांना वापरणार?
शिवसेना सत्तेत असताना काय होतं आणि काय होत नाही? अरविंद तिकडे सत्तेत असताना हा कायदा रोखला होता, मी मुख्यमंत्री असताना हा काळा कायदा रोखला होता, आम्हीं दोघही सत्तेतुन बाहेर गेल्यावर हा काळा कायदा आणला, मग नुकसान कुणाच झालं? माझ झालं? अरविंदच झालं? की राज्याच झालं? कामगारांच झालं?
अरविंदच सुद्धा कौतुक एवढ्यासाठी करायला हवं की जस मी एका क्षणात वर्षा सोडुन दिलं, मुख्यमंत्री पद सोडुन दिलं आणि ज्या वेळेस माझ्या लक्षात आलं हे भाजप वाले गडबड करत आहेत, मी अरविंदला फोन करुन सांगितल, ‘अरविंद राजीनामा द्या’, ‘येस सर’! का? माझ काय चुकलं? काय करू? अस नाही… फोन ठेवला, राजीनामा देऊन आला. ही अशी माणसं, शिवसेनाप्रमुखांनी घडवलेली माणसं!
प्रयत्न सुरू आहे, पूर्ण न्यायव्यवस्थाच ते त्यांच्या अंमलाखाली घ्यायला पहात आहेत. न्यायवृंद सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती नेमण्याचा देखील अधिकार आम्हांला हवा आहे. एकदा का न्यायमूर्ती ते नेमायला लागले तर न्याय मागायचा कुणाकडे? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
