पण देवेंद्र फडणवीस तर नशा केलेल्या सरकारचे सरदार – संजय राऊत
पुणे : आम्हाला नशा केलेले पैलवान म्हणतात, पण हे सरकारच नशा केलेले सरकार आहे व त्यांचे सरदार देवेंद्र फडणवीस आहेत, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
संजय राऊत म्हणाले, फडणवीस सगळीकडे सांगतात की ते ग्रुहमंत्री झाले म्हणून काहीजणांची अडचण झाली. पण ज्यांची अडचण होणार होती ते तर त्यांच्या जवळच आहेत. ते म्हणतात, सरदारच आमचा आहे, आम्हाला काही होणार नाही. नशा सरकारने केली आहे, आम्ही नाही. मला दौंडला जाऊ देत नाहीत. १४४कलम लावले, पोलिस बंदोबस्त बोलावला. दौंडचा कारखाना पाकिस्तानात आहे का? यांना कशाची इतकी भीती वाटते, असा प्रश्न राऊत यांनी केला.
शरद पवार यांच्याबरोबरच्या बैठकीत ऊद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला हे खोटे आहे. मी स्वतः बैठकीत होतो. त्यामुळे ही अफवा आहे असे ठामपणे सांगतो व अफवा पसरवणे गुन्हा आहे, हे माध्यमांनीही लक्षात घ्यावे, असा इशारा राऊत यांनी दिला. अजीत पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग्ज लागले असतील तर लागू द्या, ज्याच्यामागे १४५ जण आहेत तो कोणीही मुख्यमंत्री होईल. तसे वाटण्यात गैर काही नाही, असेही राऊत म्हणाले.
