काळानुरूप कलाकारालाही बदलावेच लागते – कौशिकी चक्रवर्ती
पुणे : “कलाकार हा कलेचा प्रचार करणारा प्रवक्ता असतो. आपण ज्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत राहतो, ती नेहमीच बदलत असते. त्यामुळे कलाकाराही बदलावे लागते. जर कलाकार काळानुरूप बदलला नाही, तर केवळ कलाकारच नव्हे तर ती कलादेखील कालबाह्य ठरते. त्यामुळे कलाकाराने काळानुरूप बदलणे महत्वाचे आहे. त्यासाठी कलाकाराला दोष देणे चुकीचे ठरेल, असे मत प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी व्यक्त केले.
शहरात २० जानेवारीपासून सुरु होणाऱ्या १६ व्या वसंतोत्सव संगीत महोत्सवात चक्रवर्ती आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहूल देशपांडे हे प्रथमच एकत्र गाणार आहेत. त्यानिमित्ताने पुण्यात आलेल्या चक्रवर्ती या देशपांडे यांच्यासमवेत पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे शुक्रवारी पत्रकार भवन येथे आयोजित सांस्कृतिक कट्टा उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, खजिनदार अभिजित बारभाई उपस्थित होते. एकत्रित सादरीकरण, संगीतातील बदल, संगीतातील घराणी अशा विविध विषयावर चक्रवर्ती आणि देशपांडे यांनी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी संगीताच्या बदलत्या स्वरूपाबाबत विचारले असता, कौशिकी म्हणाल्या, “ कलाकारावर होणारे रागाचे संस्कार ही संगीतातील ताकद आहे. पूर्वीच्या पिढीवर हे संस्कार खोलवर रुजले होते. त्यांनी रचलेली गाणी ही अजरामर होती, आजही त्या गाण्यांची भुरळ कायम आहे. त्यामुळेच संगीतावर रागांचे संस्कार महत्वाचे आहे. शास्त्रीय संगीताचा प्रभाव आजही कायम आहे. लोक एक – दीड तास बसून शांततेत शास्त्रीय संगीत ऐकतात. त्याचा सकारात्मक प्रभाव त्यांच्यावर होत असतो. संगीतातून एक मानसिक शांती त्यांना मिळत असते.
आपल्या प्रथम एकत्रित सादरीकरणाबाबत कौशिकी आणि राहुल म्हणाले, “ स्टेज’वर सादर होणाऱ्या जुगलबंदीपेक्षा विचारांची जुगलबंदी महत्त्वाची असते, त्यामुळे गाण्याबाबत एक दडपण होते. पण आम्ही एकत्र रियाज केल्यावर विचारांचा जुळून आले आणि एकत्र सादरीकरणासाठी काहीतरी वेगळे सादर करण्याची तयारी आम्ही केली आहे. त्यामुळे उद्याचे सादरीकरण हे खूप वेगळे असणार आहे.”
संगीत घराणे आणि आजचे संगीत याबाबत बोलताना राहुल देशपांडे म्हणाले, “ पूर्वी घराण्यांना राजाश्रय मिळाला त्यातून त्यांना ठिकाणांची नावे मिळाली. आज सोशल मीडियामुळे आपल्याकडे पर्याय वाढला आहे. रसिकांनाही विविध पर्याय आवडू लागले आहेत. संगीत हे आपल्या सर्वांपेक्षा खूप मोठे आहे, आणि विचारांची देवाण घेवाण वेगळ्या वातावरणात होऊ शकते, ते संगीतातून दिसून येते. जे चांगले आहे, आवडते, ते ऐकण्याकडे लोकांचा कल वाढत आहे.’’
RRR चित्रपटातील ‘नाटो नाटो’ या गाण्याला आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबाबत आपले मत व्यक्त व्यक्त करताना राहुल आणि कौशिकी म्हणाले, “भारतीय म्हणून एका भारतीय कलाकाराला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळतोय याचे आनंद आहे. पण एक कलाकार, संगीताचे विद्यार्थी म्हणून मला ते गाणे पटले नाही. कारण त्या गाण्याचे बोलच कळत नाही. त्याचबरोबर एखाद्या गाण्याला पुरस्कार मिळाला, तरच ते सर्वोत्तम ठरते, असे मला वाटत नाही. जे कळते, जे भावते आणि ज्यातून काहीतरी घेण्यासारखे असते, तीच उत्तम कलाकृती ठरते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकृत मोकाशी यांनी केले.
