Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भाजपने नवीन इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केलीय का?

मुंबई : भारतीय जनता पक्षाने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापना केलीय का? असा खडा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे वक्तव्य केले होती.
त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याची यांची लायकी नसल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत हे नाशिक दौ-यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौ-याचा आजचा तिसरा दिवस आहे. आज ते मुंबईकडे रवाना होणार आहेत, त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली.

तुम्ही कर्नाटकच्या ‘आरे’ला ‘कारे’ कधी करणार?
कर्नाटकच्या आरेला कारेने उत्तर देऊ, असे वक्तव्य भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे. यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली, कर्नाटक महाराष्ट्रात घुसलेय, तुम्ही त्यांच्या ‘आरे’ला ‘कारे’ कधी करणार? असा सवाल राऊतांनी यावेळी केला. आता आरेला कारे करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षांची आहे. तुम्हाला उद्यापर्यंत दिसेल विरोधी पक्ष काय करणार ते, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षसुद्धा लवकरच भूमिका जाहीर करणार
महाराष्ट्राची जनता ही ताकद आहे. उदयनराजे भोसले असतील किंवा संभाजीराजे छत्रपती असतील ते आपापल्या पद्धतीने जागरूकता निर्माण करत आहेत. विरोधी पक्षसुद्धा लवकरच त्यासंदर्भात आपली भूमिका जाहीर करेल. उद्या किंवा परवा याबाबत आम्ही बोलू असेही राऊत यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत भाजपचे लोक जी अभद्र भाषा वापरतात ते लोक शिवसेनेच्या बाबतीतही अभद्र बोलू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना यांचे एक नाते आहे. त्याच्यामुळे जे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचे बोलतात ते आम्हाला काय सोडणार असेही राऊत म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading