महात्मा फुले हे आदिवासी कवितेचे पहिले उद्गाते – विश्वास वसेकर
पुणे : ” महात्मा फुले हे पहिले आधुनिक मराठी कवी, तर सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या आधुनिक मराठी कवयित्री तर होतच.शिवाय आज मराठी काव्यप्रवाहात महत्त्वाचं स्थान प्राप्त करत असलेल्या आदिवासी कवितेचेही प्रथम उद्गाते महात्मा फुले हेच होत”, अशा आशयाचे गौरवोद्गार ज्येष्ठ कवी विश्वास वसेकर ह्यांनी काढले.
महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या’ सहाव्या महात्मा फुले अभिवादन कविसंमेलना’ च्या अध्यक्षस्थानावरून वासेकर बोलत होते.ह्या कविसंमेलनाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद, अक्षरभारती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे महात्मा फुले अध्यासन ह्या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कविसंमेलनाचे समन्वयक, ‘अक्षरभारती’ चे विश्वस्त डॉ. अविनाश सांगोलेकर ह्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केल्यानंतर महात्मा फुले समता परिषदेचे सदस्य रवी चौधरी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, तसेच कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार ह्यांची समयोचित भाषणे झाली. ‘अक्षरभारती’ चे कार्याध्यक्ष श्रीकांत चौगुले ह्यांनी आभारप्रदर्शन केले, सूत्रसंचालन प्रा. रूपाली अवचरे ह्यांनी केले.
ह्या कविसंमेलनामध्ये उद्धव कानडे, बंडा जोशी, दीपक करंदीकर, मृणालिनी कानिटकर – जोशी, प्रसाद माधव कुलकर्णी (इचलकरंजी), धनंजय सोलनकर (लोहगाव), बबन धुमाळ (हडपसर), अनिल दीक्षित (सांगवी), अभिजित काळे (पिंपरी चिंचवड) ह्यांनी आपल्या आशयगर्भ कविता सादर करून कविसंमेलनात रंगत आणली. रमेश बेंद्रे, वैशाली मोहिते, प्रज्ञा करडखेडकर – वसेकर ह्यांच्यासह जाणकार रसिकांनी ह्या कविसंमेलनाला आवर्जून उपस्थिती लावली होती.
