प्राध्यापकांकडून लाखो रुपये घेतल्याच्या प्रकरणाबाबत प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी : डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात लैंगिक छळाच्या तक्रारीमध्ये धर्मेश धवनकर यांनी सात प्राध्यापकांकडून लाखो रुपये घेतल्याच्या प्रकरणी तपासी पोलीस अधिकारी व पोलीस आयुक्त यांची बैठक घेऊन तपासाच्या प्रगतीची माहिती घेणार तसेच लवकरच सविस्तर सर्वच विद्यापीठांचा ह्वर्च्युअल आढावा बैठक ना. ऊच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सुचनेनुसार घेणार असल्याचे आज सांगीतले.
महाविद्यालयीन व विद्यापीठातील अत्याचाराच्या घटनांवरील उपाययोजना आणि नागपूर विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राच्या अडचणी या विषयासंदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन येथे बैठक झाली. या बैठकीस नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॅा.सुभाष चौधरी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अवर सचिव किशोर जकाते, उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रशासकीय अधिकारी सुयश दुसाने,स्त्री अभ्यास केंद्राच्या धम्मसंगिनी रमागोरख आदी उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या,विशाखा समितीच्या बैठका विद्यापीठात व महाविद्यालयात नियमित झाल्या पाहिजेत. या बैठकीतील प्राप्त तक्रारींचा आढावा प्रत्येक महिन्याला घेण्यात यावा. तसेच प्रत्येक महाविद्यालयाच्या दर्शनी भागात तक्रार पेटी असली पाहिजे. तक्रार पेटी प्रत्येक महाविद्यालयात व विद्यापीठात ठेवली आहे की नाही याबाबत अहवाल मागवावा. विद्यापीठात महिलांच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, किती तक्रारी निकाली निघाल्या, किती तक्रारी प्रलंबित आहेत याबाबत एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा.
विद्यापीठे व महाविद्यालये परिसरात विद्यार्थीनींच्या छेडछाडीच्या तक्रारींचा निपटारा विशाखा समिती मार्फत तात्काळ झाला पाहिजे. यासाठी आवश्कतेनुसार कायदे सहायकाची नेमणूक करण्यात यावी. तसेच प्रसार मध्यामांचेकडे अशा लैंगिक तक्रारीबाबत काही विशेष माहिती असेल तर त्यांनी अंतर्गत तक्रार निवारण समिती , कुलगुरू किंवा उपसभापती कार्यालयास कळवावे. राज्यात ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडतात या घटनांच्या तक्रारीची पोलीस स्थानकात नोंद होते. या तक्रारीचा राज्यस्तरीय डाटा बेस एकत्रित असणे आवश्यक आहे* महाविद्यालयीन विद्यार्थीनीच्या सुरक्षिततेबाबतीत नियमांचे कठोर पालन झाले पाहिजे. विद्यापीठ व महाविद्यालयातील अत्याचाराच्या घटनेबाबत राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच घेण्यात येईल. या बैठकीत राज्यातील महिलाविषयी अत्याचाराच्या तक्रारीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.