Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

जी-२० परिषदेचे अध्यक्षपद हा भारताच्या विश्वबंधुत्व भूमिकेचा जागतिक सन्मान – खा .गिरीश बापट 

पुणे : ऊर्जा सुरक्षा, अन्नसुरक्षा, आणि विश्वकल्याण या त्रिसूत्रीचा मंत्र देऊन जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दिलेल्या बंधुत्वाच्या संदेशातून भारत जगाचे नेतृत्व करण्यास सिद्ध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेत बजावलेल्या भूमिकेचा भारतीय म्हणून आम्हास अभिमान वाटतो, अशा शब्दांत भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी आज जी-२० शिखर परिषदेतील भूमिकेबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले.

बापट म्हणाले, आजचे जग सामुहिक नेतृत्वाकडे आशादायी नजरेने पाहत आहे. अशा परिस्थितीत जी-२० चे अध्यक्षपद भारताकडे आल्याने एक जद, एक ऊर्जा, एक सूर्य या पंतप्रधान मोदी यांच्या आग्रहास जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे, असे ते म्हणाले. जी-२- चे अध्यक्ष म्हणून भारताची, पर्यायाने पंतप्रधान मोदी यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. भारत एकीकडे विकसित देशांशी घनिष्ठ संबंध ठेवून आहे आणि सोबतच विकसनशील देशांचा दृष्टिकोन देखील योग्य प्रकारे समजून घेत आहे. याच आधारावर जी-२० अध्यक्षपदाची रूपरेखा जागतिक दक्षिण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल साउथ’च्या देशांच्या सर्व मित्रांसोबत मिळून बनविण्याच्या पंतप्रधानांच्या भूमिकेचेही त्यांनी स्वागत केले.

या जगात कोणीही फर्स्ट वर्ल्ड किंवा थर्ड वर्ल्डचे न राहता सर्व जण एकाच जगातले असतील, ही पंतप्रधानांची भूमिका भारताच्या ‘वसुधैव कुटुम्बकम’ या प्राचीन परंपरेशी सुसंगत अशी असून आता संपूर्ण जगाने या परंपरेचा पाईक होऊन हातात हात घालून भविष्याची आणि विकासाची वाटचाल करावी हा पंतप्रधानांचा उद्देश स्वीकारल्याचे संकेतही या परिषदेतून मिळाले आहेत. आता संपूर्ण जगाला एका सामायिक उद्देशासाठी, एका उज्ज्वल भविष्यासाठी, सोबत आणण्याच्या दृष्टीकोनातून भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ येईल, असा विश्वासही बापट यांनी व्यक्त केला.

भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्यामुळे जागतिक विकासासाठी भारताची उर्जासुरक्षासुद्धा महत्वाची आहे. खतांचा तुटवडा हे अन्नसुरक्षेपुढील आव्हान असल्याने खते व धान्ये यांची पुरवठासाखळी हमखास अखंड राखण्यासाठी आपल्याला परस्परांमध्ये सहमतीचा करार राबविण्यावरही पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनास जागतिक पाठिंबा मिळत असल्याने भारताची मान जगात उंचावली आहे, असेही बापट यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading