‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांचा आक्षेप
पुणे : चित्रपट निर्मितीसाठी मुभा घेणे ही काल्पनिक चित्रपटांसाठी घेणे ठीक. मात्र, ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांसाठी ती घेणे योग्य नाही. चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने त्याचा वापरही जबाबदारीने होणे अपेक्षित आहे, ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या निर्मितीत त्या जबाबदारीचे भान दिसत नाही; तसेच त्यामुळे ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटनाही दाखवण्यात आल्या आहेत. याबाबत पुण्यातील पत्रकार परिषदेत देशपांडे वंशज रुपाली देशपांडे यांनी आक्षेप नोंदवला.
या पत्रकार परिषदेला रतन विजय देशपांडे, अमर वामनराव देशपंडे, किरण अमर देशपांडे उपस्थित होते.
रतन देशपांडे म्हणाल्या, शिवाजी महाराजांनी बाजीप्रभूंना वरंधा घाटात जासलोलगड किंवा कासलोलगड हा किल्ला वसवण्याची जबाबदारी दिल्याचे पत्र उपलब्ध आहे. प्रत्यक्षात चित्रपटात अनेक ठिकाणी देवळे बांधल्याचे दाखवण्यात आले आहे. बाजीप्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजीप्रभू यांनी बांदल देशमुखांच्या सैन्याचे नेतृत्व केले. दोन्ही भावांनी प्राणांची आहुती देऊन शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. मात्र, चित्रपटात दोन्ही भावांच्या लहानपणीच्या कटू प्रसंग दाखवून फुलाजी प्रभू यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचेही रतन देशपांडे यांनी स्पष्ट केले.
