आव्हाड राजीनामा द्या… ती जागा आम्ही जिंकू – आशिष शेलार
मुंबई : जर आव्हाड निर्दोष आहेत तर त्यांनी त्यांची कायदेशीर बाजू लढावी. निर्दोष असल्याचे सिद्ध करता येत नसेल तर त्यावेळेला असे वेडे चाळे केले जातात. आमदारकीचा राजीनामा आणि या गोष्टीचा संबंध नाही आणि द्यायचा असेल तर द्या. ती जागा आम्ही जिंकून दाखवू, अशी टीका मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाडांवर केली आहे.
दरम्यान ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादानंतर आता पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड एका नव्या वादात अडकले आहेत. ४० वर्षीय तक्रारदार महिलेने या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलिस अधिका-यांशी संपर्क साधला. पोलिसांनी महिलेला तक्रार दाखल करण्यास सांगितले. दरम्यान, मुंब्रा पोलिस ठाण्यात ४० वर्षीय महिलेने जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरून पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढे बोलताना शेलार म्हणाले की, आमदारकीचा राजीनामा देणे आणि प्रत्यक्षात पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेळे आरोप याचा काही संबंध नाही. हे सर्व चर्चच्या गाडीमध्ये बसून मुलुंड आलं का? हे विचारण्यासारखं आहे, असेही शेलार म्हणाले. जर ते निर्दोष आहेत तर त्यांनी त्यांची कायदेशीर बाजू लढावी आणि जिंकावे, असेही ते पुढे म्हणाले.
सामान्य मराठी माणसाला, मराठी कुटुंबाला त्रास देणे, त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करणे, जबरदस्ती, विनयभंग आणि दादागिरी करू नये, केल्यास त्याला कायदेशीर बडगा आहे. हे गृहमंत्र्यांनी दाखवले आहे. यामुळे मी गृहमंत्र्यांचे स्वागत आणि अभिनंदन करतो. माझी चोरी पकडली गेली तर पकडणारा पोलिस जबाबदार असे तालिबानी माणसाला शोभणारे वक्तव्य हे राष्ट्रवादी आणि जितेंद्र आव्हाड करत आहेत, असा आरोपही शेलार यांनी केला आहे.
