मोठ्या माणसांच्या क्रियेची सिद्धी ही त्यांच्या स्वत्वात -राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे
पुणे : प्रभू रामचंद्रांचे रामत्व ज्यांच्या जीवनात दिसते आणि अशी रामत्व असणारे लोक ज्या देशात कार्यरत आहेत त्या देशात खरा ‘राम’ आहे असे म्हणतात. कुठल्याही मोठ्या माणसांच्या क्रियेची सिद्धी ही त्यांच्या स्वत्वात असते. कुठल्याही उपकरणावरती त्यांच्या क्रियेची सिद्धी अवलंबून नसते. सामुग्री पुरेशी नसेल तरी हरायचं नाही, हे आपल्याला प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या कृतीतून सांगितले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी केले.
आफळे अकादमीच्या वतीने राष्ट्रीय कीर्तन सम्राट कै. गोविंद स्वामी आफळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे महोत्सव संपन्न झाला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (नि.)उपस्थित होते.
महोत्सवात डॉ. अमृता चांदोरकर यांचे ‘निरामय जीवन’ या विषयावरील व्याख्यान आणि मुकुंदबुवा देवरस आणि चारुदत्त आफळे यांची कीर्तने झाली. दरवर्षी महोत्सवात अनेक मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदा कीर्तन सेवेसाठीचा पुरस्कार नागपूर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार मुकुंदबुवा देवरस आणि सामाजिक कार्यासाठीचा पुरस्कार पियुष शहा व मुंबई येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजेंद्र भोसले यांना प्रदान करण्यात आला.
ह.भ.प. चारुदत्त आफळे म्हणाले, स्वातंत्र्याचा जसा अमृतमहोत्सव आहे. तसाच फाळणीचा देखील अमृतमहोत्सव आहे. फाळणीच्या अनेक जखमा आहेत. त्या जखमा विसरणे हे शहाण्याचे लक्षण नाही. आपण प्रयत्नवादी माणसांपेक्षा दैववादाला महत्त्व देतो आणि प्रयत्नवादी माणसांना कमी लेखतो. ही खंत ही त्यांनी कीर्तनातून सांगितली.
