Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

डीसीएम संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे तैलचित्र भेट

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग ज्ञानविस्तार कार्यक्रमात डीसीएम संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे तैलचित्र भेट देण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे तैलचित्र भेट देण्यात आले. यावेळी प्र. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, जेष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, प्रा. डॉ. विलास आढाव, डीसीएम संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, अध्यक्ष डी. टी. रजपूत, डॉ. पी. विश्वनाथ गुप्ता, काजल शेवाळे, प्राचार्य डॉ. नरेश पोटे, उपप्राचार्य डॉ. जे.के. म्हस्के, डॉ. बाळासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बीजभाषण करताना प्र. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, की अस्पृश्य मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोठे कार्य केले आहे. आज नव्या शैक्षणिक धोरणातून आजीवन शिक्षणाबाबत नेमकी भूमिका घेणे काळाची गरज बनली आहे. शिक्षक, संशोधन व विस्तारीकरण हे शिक्षणाचे मुख्य आयाम बनले आहेत. संपूर्ण समाज ज्ञानी करणे, हे शिक्षकांचे मुख्य कर्तव्य आहे. तंत्रज्ञानाचा वापर हाही महत्त्वाचा आहे. शिक्षणात तंत्रज्ञानामुळे गरीब-श्रीमंत दरी राहिलेली नाही, ही महत्त्वाची बाब आहे.
बाबा आढाव म्हणाले, विठ्ठल रामजी शिंदे हे चळवळींशी नाते जोडलेले थोर समाजसुधारक होते. अस्पृश्य वर्गाची शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी नाना पेठेत अहिल्याश्रम सुरू केले. त्यातून या मुलांना शिक्षण दिले. आज एवढ्या सुविधा असतानाही शैक्षणिक गळती का होतेय, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. निरंतन शिक्षण यशस्वी व्हायचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक प्रेरणा घेतली पाहिजे.
डॉ. विलास आढाव म्हणाले, की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे शैक्षणिक कार्य लक्षात घेता या तैलचित्रातून आजची पिढी निश्चित बोध घेईल. आजच्या शिक्षणातील मूळ पाळेमुळे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारसरणीत मिळतात. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे यांचे शैक्षणिक योगदान नव्या पिढीला प्रोत्साहन ठरत आहे.
विशाल शेवाळे म्हणाले, मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक, लेखक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. ते निष्ठेचे प्रतीक होते. अस्पृश्यता निवारणारे खंदे पुरस्कर्ते होते. संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी 18 ऑक्टोबर 1906 रोजी डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे तैलचित्र विद्यापीठात असावे, अशी कालकथीत एमडी शेवाळे यांची इच्छा होती. भविष्यात विद्यापीठाला डीसीएम संस्थेकडून काही सहकार्य लागत असेल, तर निश्चित केले जाईल.
सूत्रसंचालन कीर्ती करंजावणे यांनी, तर आभार डॉ. पी. विश्वनाथ गुप्ता यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading