परतीचा पाऊस राज्यात 20 ऑक्टोबरपर्यंत बरसणार; हवामान विभागाचा अंदाज
पुणे : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासहित मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. याशिवाय, शुक्रवारी राज्यात परतीच्या पावसाने पुणे, मुंबई, ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली.सोयाबीन पिकाची पावसामुळे नासधूस झालीय. यामुळे पाऊस कधी थांबणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.
परतीचा पाऊस राज्यातून 20 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णपणे माघार घेऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात शनिवारपासून पावसाचा जोर कमी होईल. तर दिवाळीदरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.