Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

ज्ञानाची उत्कंठा व मानवतेमुळे यशाचे शिखर गाठता येते –  नमिता थापर

पुणे : “ज्ञान संपादनाची भूक म्हणजे उत्कंठा आणि मानवता या दोन सूत्रांच्या जोरावर प्रत्येक व्यक्ती यशाचे शिखर गाठू शकतो.” असे विचार एमक्योर फार्मास्युटिकल्स लि.च्या कार्यकारी संचालिका नमिता थापर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन कॉन्क्लेव्हतर्फे संशोधन, नवकल्पना, डिझाइन आणि उद्योजकता (आरआयडीई) या थीम वर आधारीत ‘राइड इनोवेेशन कॉन्क्लेव्ह २०२२’ या पाच दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी  आयआयएम, लखनौचे मार्केटिंग संचालक डॉ. सत्यभूषण डॅश हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्र कुलगुरू डॉ. तपन पंण्डा, सेंटर फॉर इंडस्ट्री अ‍ॅकेडमिया पार्टनरशिप्सचे वरिष्ठ संचालक प्रवीण पाटील, प्र कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.
नमिता थापर म्हणाल्या, “देशातील उद्योग जगात खूप मोठे परिवर्तन होतांना दिसत आहे. त्याची पाऊले ओळखून युवकांनी संशोधन आणि नवकल्पनेबरोबरच ज्ञानाची भूख कधीही मंद होऊ देऊ नका. सतत नव नवीन गोष्टी शिकत रहावे. सदैव आपल्या कार्यावर लक्ष्य ठेऊन कार्य करावे. युवकांनी स्वतःला सिद्ध केले की यश तुमच्या पाठीमागे येईल. स्वतःवर प्रेम करून जीवनात अहंकाराला कधीही थारा देऊ नका. त्यामुळे नुकसानच होते असा सल्ला ही त्यांनी दिला.”
डॉ. सत्यभूषण डॅश म्हणाले,“समाज कल्याणासाठी शाश्वत संशोधन गरजेचे आहे. नव्या उद्योजकांनी असे उत्पादन करावे की जेणे करून सर्वांचे कल्याण होईल. त्याच प्रमाणे पर्यावरणाचे रक्षण ही होईल. शाश्वत विकासातच देशाचे कल्याण आहे. आजच्या काळात नव उद्योजकांनी पारंपारिक व्यवसायापासून वेगळे काही नवे करण्यासाठी विचार करावा. आजच्या काळात हॉटेल आणि टुरिझम इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“वर्तमान काळात सर्वांना शांती हवी आहे. त्यामुळे नव संशोधकांनी असे संशोधन करावे जेणे करून समाजाचे कल्याण होईल. रि-सर्च या शब्दाचा अर्थ उलगडला तर असे जाणवेल की रि  म्हणजे स्व व सर्च  म्हणजे संशोधन  म्हणजेच स्वतः संदर्भात संशोधन करणे होय. भगवान हे कोणी व्यक्ती नाही तर ती एक शक्ती आहे. त्या ऊर्जेचा योग्य वापर करून समाज कल्याण करावे. ”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या कल्पनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. एका युनिक विचारांच्या देवाण घेवाण होईल. नवनिर्मिती, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर शाश्वत विकास होऊ शकतो. या देशात अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या संशोधनाच्या जोरावर सोडविल्या जाव्यात. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी प्रत्येक विभागातील शिक्षकांना १-१ लाख रूपये देऊन नव संशोधन व नवनिर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. आमच्या संस्थेने जगातील सर्वोत्कृष्ट नव संशोधन करून डोमची निर्मिती केली त्यातून मानवता व शांतीचा संदेश दिला जात आहे.”
डॉ. प्रसाद खांडेकर म्हणाले, “भारत देशाला प्रति वर्ष कमी प्रमाणात पेटंट मिळतात. दुसरीकडे अमेरिका आणि चीन या देशात नवे संशोधन आणि पेटंटची संख्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे नव उद्योजकतेसाठी देशात खूप मोठी संधी उपलब्ध आहे. त्याचा लाभ युवकांनी उचलावा.
प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. तपण पांडे यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading