पुण्यातील ४०-५० वर्षांपूर्वीच्या इमारती, बांधकामे यांचा पुनर्विकास बाबत सकारात्मक निर्णय घेणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गणेश मंडळांना भेट देण्यासाठी पुणे दौऱ्यावर आहेत. तेव्हा त्यांनी केसरी वाडा गणपतीचे दर्शन घेतले. तिसरी वाड्यात जाऊन आमदार मुक्ता टिळक यांची भेट घेतली. टिळक यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पत्रकारांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले, मुक्ता ताईंवर सध्या उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीतही त्या नागरिकांच्या भल्याचा विचार करत आहेत. त्यांची तळमळ पुण्यातील लोकांसाठी आहे. ४०-५० वर्षांपूर्वीच्या इमारती, बांधकामे यांचा पुनर्विकास एफएसआयच्या मुद्दयामुळे अडकला आहे. यातून काही मार्ग निघावा अशी इच्छा व्यक्त केली असून त्यासंदर्भातील पत्र त्यांनी मला दिले आहे. याबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय घेतला जाईल. मी लगेच अधिकाऱ्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत. केसरीवाड्याला वैभवशाली इतिहास आहे. टिळक कुटुंबियांनी या वास्तूची जपणूकही केली आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो, असेही त्यांनी नमूद केले.
टिळक वाड्यातून बाहेर पडताना एकनाथ शिंदे यांनी गाडीच्या फूट स्टेअरवर उभे राहून नागरिकांना अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजरही केला.
एकनाथ शिंदे म्हणाले मी,पुण्यामध्ये बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्सवाचा आनंद, उत्साह पहायला मिळत आहे. यंदा सर्वांना मोकळा श्वास घेत, जल्लोषात गणेशोत्सव साजरा करता येत आहे.
दोन वर्षे राज्यातील जनता कोरोनामुळे त्रस्त झाली होती. सर्वत्र नकारात्मकता पसरली होती. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सवापासूनच सरकारने सर्व निर्बंध उठवले. नियम पाळून आणि काळजी घेऊनही उत्सव साजरे करता येतात, हे लोकांनी दाखवून दिले, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केल्या.