शिंदे व फडणवीस सरकारला मतदानाच्या माध्यमातूनच जनताच उत्तर देईल -डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : महाविकास आघाडी सरकारने जे काम करून दाखवले त्यापासून जनतेची दिशाभूल करण्याचे काम या सरकारकडून सुरू आहे. या माध्यमातून शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्याचा उद्योग सुरू आहे. मात्र, राज्यातील सामान्य जनता जागरूक आहे. त्यामुळे या सरकारला मतदानाच्या माध्यमातूनच जनताच उत्तर देईल.असे मत शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात व्यक्त केले.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत जे मोठे झाले. ते लोक आता बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना दोष देत आहेत. त्यांना कमी दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, यातून काहीही होणार नाही. निवडणुकीत होणाऱ्या मतदानातून जनता यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा नीलम गोऱ्हे यांनी दिला.
उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे रविवारी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राचे, देशाचे व समाजाचे मोठे नुकसान झाले. अपघात झाल्यानंतर रस्त्याच्या कामाबाबत तातडीने आढावा घेण्यात आला. मात्र, इतके दिवस स्थानिक लोक या रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. त्याची काळजी सरकार करणार की नाही. या रस्त्याच्या कामात यापूर्वीच सुधारणा व्हायला हवी होती. असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
राज्यात पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची गरज आहे. त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी राज्य चालवणारे प्रमुख केवळ शिवसेना आणि ठाकरे यांच्यावर टीका करण्यात वेळ घालवत आहेत. त्यांच्या टीकेने शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही. शिवसेना पुन्हा नव्या जोमाने पूर्वीइतकीच ताकदवान होणार आहे.
