PMC – अधिकारी आणि कर्मचार्यांना शिस्त लावण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय
पुणे :अधिकारी आणि कर्मचार्यांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेने अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी आणि कर्मचार्यांनी ड्युटीच्यावेळेत कार्यालयात येण्यासाठी आणि जाण्यासाठी आता बायोमेट्रीक हजेरीला आधारकार्डही अनिवार्य केले आहे. याकरिता अधिकारी आणि कर्मचार्यांना नव्याने स्मार्ट ओळखपत्र देण्यात येणार असून कार्यालयात आल्यावर आणि जाताना आधारकार्डमधील शेवटचे आठ क्रमांक टाकून नंतर थंब एम्प्रेशन करावे लागणार आहे. ही यंत्रणा थेट अधिकारी व कर्मचार्यांच्या वेतन पत्रकाच्या प्रणालीस जोडण्यात येणार आहे.
महापालिकेच्या मुख्य कार्यालयासोबतच उपायुक्त, क्षेत्रिय कार्यालयांमध्ये सुमारे १८ हजार अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. अधिकारी आणि कर्मचार्यांनी प्रामाणिकपणे ड्युटीवर यावेजावे यासाठी महापालिकेेने वेळोवेळी नवनवीन उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी अधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेतली आहे. परंतू या यंत्रणेतील त्रुटी शोधून त्यावर मात करणार्या काही मंडळींमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचार्यांच्या ड्युटीवर येण्याजाण्याच्या वेळेवर अधिक नियंत्रण आणण्यासाठी सध्याची बायोमेट्रीक हजेरीची पद्धत आणखी अपग्रेड केली आहे. बायोमेट्रीक हजेरीसोबत अधिकारी व कर्मचार्यांचे आधारकार्डही अनिवार्य केलेे आहे. आधारकार्ड, छायाचित्र व अन्य माहितीची नोंद असलेले स्मार्टकार्ड प्रत्येकाला देण्यात येणार आहे.
कार्यालयात हजेरी लावताना व डयुटीवरून घरी जाताना दोन्ही वेळेस अधिकारी व कर्मचार्यांना आधारकार्डमधील शेवटचे आठ क्रमांक डायल करून थंब इम्प्रेशन करावे लागणार आहे. यासाठी सर्व कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक अटेन्डस मशीन बसविण्यात आल्या आहेत. विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांच्या नेतृत्वाखाली ही सिस्टिम तयार करण्यात आली असून प्रत्येक विभागामध्ये या प्रणालीसाठी एक नोडल ऑफीसर नेमण्यात यावा, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.
अधिकारी आणि कर्मचार्यांच्या वेतनासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. आधारकार्डसोबत जोडलेल्या बायोमेट्रीक हजेरीची प्रणाली ही वेतन प्रणालीसोबत जोडण्यात येणार आहे. अशी माहिती महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून यावर काम सुरू आहे. यामुळे अधिकारी व कर्मचार्यांना शिस्त लागण्यास मदत होणार असून या दोन्ही प्रणाली जोडल्यानंतर दरमहा काढण्यात येणार्या पगारबिलांमध्ये देखिल अधिक अचूकता येईल, असा विश्वास अधिकार्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
