पुण्यात,” हर घर तिरंगा” फडकणार
पुणे : भारतीय जनता पार्टीतर्फे आज केंद्र सरकार प्रायोजित हर घर तिरंगा या अभियानाचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांचे वंशज तसेच ज्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावली असे सैनिक व शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना हरघर तिरंगा अभियानाचा शुभारंभ करताना राष्ट्रध्वज तिरंगा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
उरी सर्जिकल स्ट्राइकचे मास्टर माईंड मेजर जनरल राजेंद्र लिंभोरकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिरंगा देऊन सन्मानित करण्यात आले. मेजर जनरल राजेंद्र लिंभोरकर यांनी मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की जर तिरंगा नसेल तर जीडीपीला काही अर्थ राहणार नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नात विनिता जोशी, लहुजी वस्ताद यांचे वंशज केतन साळवे व अशोक साळवे, शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या वीरपत्नी विनिता ताथवडे, स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ लिमये यांचे चिरंजीव अतुल लिमये व त्यांच्या पत्नी, चीफ ऑफ द आर्मी स्टाफ याने सन्मानित सुभेदार मेजर लक्ष्मण दगडू पाटील, शहीद मेजर शशी धरण नायर यांच्या मातोश्री लता विजय नायर, कारगिल हिरो संजय वसंत काकडे, शहीद चंद्रकांत गलांडे यांच्या वीर पत्नी निशा गलांडे, तीन आतंगवाद्यांना कंठस्नान घालताना स्वतःचा पाय गमावणारे नवनाथ दिगंबर जाधव यांचा देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिरंगा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील पुणे शहर खासदार गिरीश बापट शहराध्यक्ष जगदीश जी मुळीक, मेजर जनरल राजेंद्र लिंभोरकर, माजी मंत्री बावनकुळे, आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की तिरंग्याचा मानसन्मान प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा बिंबवला गेला पाहिजे आणि राष्ट्रीय अस्मितेशी भारतातील प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे या संकल्पनेतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हा संकल्प केला आहे. या देशातील एकही घर राष्ट्रीय अस्मितेच्या मानाचा बिंदू म्हणजेच तिरंगा विना राहू नये यासाठी आपण केलेल्या संकल्पाची ही सुरुवात आहे. ज्या लोकांमुळे तिरंग्याची शान राहिली आहे भारताचा सन्मान राहिला आहे तसेच ज्यांच्यामुळे आपण आज स्वातंत्र्य उपभोगत आहोत अशा लोकांचा आज आपण इथे सन्मान केला आहे. अहिंसा हे आपले परम कर्तव्य आहे परंतु जो समाज शक्तिशाली असतो तोच अहिंसेचे पालन जास्त समर्थ पण करू शकतो म्हणून आपला देश कायम सामर्थ्यशाली राहिला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
