Tuesday, May 5, 2026
Latest NewsPUNE

नाटक ही सर्व कलांना एकत्र आणणारी कला : सुहासिनी देशपांडे

पुणे : पूर्वी पुण्यात मेळे भरायचे, श्रावण आणि गणेशोत्सवात आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नाट्य क्षेत्राशी माझी ओळख झाली. नाटक ही सर्व कलांना एकत्र आणणारी कला आहे. नाट्य प्रशिक्षणामुळे व्यक्तिमत्व विकास साधला जाऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांनी केले.

गोल्डन आय प्रॉडक्शन, अस्मिता चित्र ॲक्टिंग ॲकॅडमी आणि वास्तुप्रसाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एकांकिका स्पर्धेतील विजेत्या कलाकारांना नाट्यगौरव पुरस्कार देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थित प्रदान करण्यात आले. त्या वेळी देशपांडे बोलत होत्या. पंडित जवाहरलाल नेहरू सांकृतिक भवन येथे हा कार्यक्रम झाला. माजी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, गोल्डन आय प्रॉडक्शनचे संचालक प्रसाद शिवरकर, अस्मिता चित्र ॲक्टिंग ॲकॅडमीच्या विश्वस्त रंजना धराधर, कवयित्री हेमा लेले, राहुल वाल्हेकर, दिग्दर्शिका पायल मर्चंट, सुधन्वा पानसे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत प्रथम आलेल्या ‘अवघा रंग एक झाला’ या एकांकिकेचा प्रयोग या वेळी सादर करण्यात आला.

माधुरी सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन पुढे नाट्य-चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले जाईल असे होत नाही. परंतु ज्या क्षेत्रात कार्यरत असाल त्या क्षेत्रात या प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.
व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने राहुल वाल्हेकर आणि पायल मर्चंट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेत प्रथम आलेल्या ‘अवघा रंग एक झाला’ या एकांकिकेला सांघिक विजेतेपदाचे पारितोषिक सुहासिनी देशपांडे, माधुरी सहस्त्रबुद्धे आणि मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. एकांकिका स्पर्धेतील अभिनय, दिग्दर्शन, संगीत संयोजन, प्रकाश योजना, नृत्य दिग्दर्शन करणाऱ्या विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत प्रसाद शिवरकर, रंजना धराधर, हेमा लेले यांनी केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन साक्षी किर्वे यांनी केले. याप्रसंगी भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे अजय नाईक, सतीश धराधर व कौस्तुभ दबडगे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading