Sunday, September 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

सावरकरांचे मोठेपण मान्य करणे हा काही लोकांसाठी राजकीय तोटा – अभिनेते शरद पोंक्षे

पुणे : सावरकरांचे मोठेपण मान्य करणे हा काही लोकांसाठी राजकीय तोटा आहे. हे लोक सावरकरांना विरोध करतात. सावरकरांवरील आक्षेपांना उत्तर देण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सावरकर विचारांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या विचारांचा प्रसार करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

डीईएसच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या वतीने मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर या सावरकरांच्या साहित्यावरील नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पोंक्षे बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. अभिनेते योगेश सोमण, शाला समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, जेआरव्हीजीटीआयचे संचालक प्रशांत गोखले, मुख्याध्यापिका लीना तलाठी, मंजूषा खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सोमण म्हणाले, सावरकरांच्या विचारात राष्ट्राचा ध्यास आणि ध्येय होते. त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी आता प्रत्येकाने सावरकर होण्याची आवश्यकता आहे.

कुंटे म्हणाले, सुजाण आणि संस्कारक्षम पीढी घडविण्यासाठी डीर्इएसच्या वतीने सातत्याने देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

जय देव जय देव जय शिवराया, जयोस्तुते, ने मजसी ने परत मातृभूमीला अशा प्रसिद्ध आणि अप्रचलित गाण्यांनी देशभक्तीच्या वातावरणाची निर्मिती झाली. हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, वंदे मातरम् या गीतांवर नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. संगीत सन्यस्त खड्ग या नाटकाच्या नाट्य प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. शाळेतील १७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading