अण्णा भाऊंनी साहित्यातून विश्व संस्कृतीच्या कल्याणाचा ध्यास पेरला – डॉ. श्रीपाल सबनीस
पुणेः- बहुसांस्कृतिक एकात्मता हा आजच्या मराठी, भारतीय आणि विश्व संस्कृतीचा कळीचा प्रश्न आहे. अनेक विचारवंत मानवी उत्थान कार्यात रमले. पण बहुधार्मिक सौहार्द आणि विश्व संस्कृतीचे कल्याण हा ध्यास पेरणारे शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्यात मराठी संस्कृतीचा सुगंध दरवळतो, असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच आणि रुग्ण हक्क परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यीक प्रा. रतनलाल सोनग्रा यांना यंदाचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृती पुरस्कार माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक रमेश बागवे, अॅड. प्रमोद आडकर, विठ्ठल गायकवाड, माजी नगरसेविका लता राजगुरु, झेन मास्टर सुदरसन, राहूल डंबाळे, उमेश चव्हाण, प्रेरणा गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, एकधर्मीय आणि एकदेशीय समाजाचे चित्र आणि चरित्र घडतांना संकुचित नागरित्व विश्वमानवासाठी बाधा बनत आहे. त्यासाठी व्यापक मानवतावादाची पेरणी सर्व क्षेत्रात झाली पाहिजे. अण्णा भाऊंच्या भूमिकेत प्रक्रीयेची नांदी दिसते. संपूर्ण विश्वाला समतेच्या धाग्याने गुंफणारा हा मराठी कलावंत सर्वांना वंदनीय आहे. लोकमान्य टिळक, शाहीर अमर शेख, उषाताई डांगे, संत ज्ञानेश्वर, यशवंतराव चव्हाण, कार्ल मार्क्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोर्की, अशा बहुसांस्कृतिक मानदंडांचा गौरव शाहीर अण्णा भाऊंनी केला. त्यांच्या अर्पण पत्रिकेचा अनुंबध मराठी बहुसांस्कृतिकतेशी जुळला आहे.
यावेळी प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी पुरस्काराला उत्तर देत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. प्रमोद आडकर यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.