प्रत्येक आई मुलांना घडवते, मुलांनी राष्ट्र घडवले पाहिजे… डॉ. गो.बं देगलूरकर
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन आणि स्वरुप-वर्धिनी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अध्यासनाचा यंदाचा ४ था “मातोश्री रमाबाई आंबेडकर मातृशक्ती पुरस्कार” सुनीता सुनील लांजेकर यांना ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ व डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू आदरणीय डॉ.गो.ब.देगलूरकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, अधिसभा सदस्य व टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे, स्व-रुपवर्धिनीचे कार्याध्यक्ष रामभाऊ डिंबळे व अध्यासन प्रमुख डॉ.सुनील भंडगे उपस्थित होते. या पुरस्कारामध्ये रू.५,०००/-चा डिमांड ड्राफ्ट तसेच सन्मानचिन्ह, समता सप्तक, शाल, श्रीफळ इ.चा समावेश होता. ” सुनीता सुनील लांजेकर यांनी अडचणींवर मात करत त्यांनी उपजत कलांचा वापर करून ऐतिहासिक पगड्या बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. आजही त्या पगड्या बनवतात.अत्यंत अवघड परिस्थितीत, पतीच्या अपघाती निधनानंतर न डगमगता त्यांनी मुलांना उत्तम चारित्र्य, अपार कष्टाची तयारी, उत्कृष्ट व ऐतिहासिक साहित्याचे वाचन-चिंतन करण्याचा मनस्वी आग्रह तसेच अखंड ज्ञानलालसा उत्पन्न करण्याची असलेली त्यांची चिकाटी इ. गोष्टी पाहून त्यांची या पुरस्कारासाठी केलेली निवड अतिशय योग्य आणि समर्पक आहे, त्यासाठी विद्यापीठाला धन्यवाद द्यायला हवेत, असे डॉ.देगलूरकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘निर्माणोंके पावन युग में, हम चरित्र निर्माण न भुले’ याच दर्शन आजच्या मातृशक्ती पुरस्काराने झाले. आई मुलाला घडवते, मुलांनी राष्ट्र घडवले पाहिजे, आज त्यांची नितांत गरज आहे. मराठी चित्रपटसृष्टी दिग्दर्शक, लेखक, गीतकार आणि कलाकार असलेल्या दिग्पाल लांजेकर सारख्या कर्तृत्ववान मुलामुळे आईला होणारा आनंद शब्दातीत आहे.”
सत्काराला उत्तर देताना सुनीता लांजेकर म्हणाल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या तयार करून मुलांची फी भरत, त्यांची वाचनाची आवड पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केले. दिग्पालला नाटकाची आवड होतीच, तो २ रीत असताना चारोळ्या करायचा. त्यांचं बालपण कालवंडू दिलं नाही. कसबा पेठेतील हाणामारी, गुंडगिरी यापासून दोन्हीही मुलगे दूर राहिले. कितीही मोठे झालात तरी आपले पाय जमिनीवरच असले पाहिजे हा माझा आग्रह त्यांनी मनोमन मानला. आज दिग्पाल मराठी चित्रपटसृष्टीत मोठा होतोय, हा खूप मोठा आनंद आहे. त्याला मिळालेल्या पुरस्कारांनी मन भरून येते.”.
याप्रसंगी डिंबळे, राजेश पांडे व प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य सौ.बागेश्री मंठाळकर, शाहीर हेमंतराजे व संगिता मावळे, शिरीष पटवर्धन, डॉ.संजय तांबट, प्रा.डॉ. श्यामा घोणसे, प्रा.डॉ.प्रशांत साठे, प्रा.डॉ.गौतम बेंगाळे, प्रा.डॉ.ज्ञानेश्वर कुंभार, प्रा.विजय रास्ते, अॅड.मुकुंद यदमल, नंदकुमार राऊत, राजेश रासगे, बागेश्री पोंक्षे तसेच युवती व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रास्ताविक डॉ.सुनील भंडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन .मंजूषा कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन समृध्दी यादव यांनी केले. सुरूवातीला लांजेकर यांची मुलाखत दिपाली थोरात यांनी घेतली.
