Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

‘शेफलर इंडिया’च्या ‘सोशल इनोव्हेटर फेलोशिप प्रोग्रॅम’मधील ११ विजेत्या कल्पना जाहीर

पुणे  : शेफलर इंडिया लि. (बीएसइ: 505790, एनएसइ: SCHAEFFLER) या औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील अग्रगण्य पुरवठादार कंपनीने आज आपल्या ‘सोशल इनोव्हेटर फेलोशिप प्रोग्रॅम’साठी निवडलेल्या १५०पैकी ११ विजेत्या कल्पना जाहीर केल्या. २४ आठवडे चाललेले मूल्यांकन आणि ज्युरींची प्रक्रिया यानंतर निवडलेल्या १५०हून अधिक प्रवेशिकांमधून ११ कल्पनांना आज पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात विजेते म्हणून घोषित करण्यात आले. ‘शेफलर इंडिया’ने २०२१च्या तिसर्‍या तिमाहीत ‘सोशल इनोव्हेटर फेलोशिप प्रोग्रॅम’ जाहीर केला होता. वंचितांसाठी शिक्षण, आरोग्य व पोषण, अक्षय ऊर्जा व पर्यावरण, जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये नावीन्यपूर्ण कल्पना सुचविण्यासाठी हे अर्ज मागविण्यात आले होते. ‘शेफलर’ने ‘बडी4स्टडी’ या भारतातील सर्वात मोठ्या शिष्यवृत्ती प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली आहे. ही संस्था शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज पुरवठादार यांची पात्र विद्यार्थ्यांशी गाठ घालून देते.

प्रोग्रॅममधील पहिल्या विजेत्या कल्पनेला पाच लाख रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले असून उर्वरित १० विजेत्या कल्पनांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले आहे. सर्व ११ विजेत्यांना भारतातील अत्युत्कृष्ट शिक्षण संस्थांपैकी एक, ‘आयआयएम अहमदाबाद’ येथील सीआयआयई (सेंटर फॉर इनोव्हेशन इनक्युबेशन अँड एंटरप्रेन्योरशिप) येथे आठ आठवड्यांची हायब्रीड मेंटॉरशिप दिली जाईल. त्यातून त्यांना आपले सोल्यूशन आणखी विकसित करण्यास आणि त्याचे प्रत्यक्षात रुपांतर घडविण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त, या विजेत्यांसह शेफलर इंडिया सहयोग करणार असून त्यांना पुढील सहयोग व संधी यांची उपलब्धता करून देण्यासाठी आपल्या नेटवर्कमध्येही सामावून घेईल.

स्पर्धेच्या ज्युरींमध्ये ‘शेफलर इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षा कदम, एचआर विभागाचे उपाध्यक्ष व सस्टेनेबिलिटी इंडियाचे प्रमुख संतनू घोषाल आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते सामाजिक उद्योजक व ‘गुंज’चे संस्थापक अंशु गुप्ता यांचा समावेश होता.

सर्वांगीण विकास आणि वाढ यांसाठी शेफलर इंडिया सक्रियपणे आपल्या ईएसजी धोरणाचा पाठपुरावा करीत आहे. वंचितांसाठी शिक्षण, आरोग्य व पोषण, अक्षय ऊर्जा व पर्यावरण, जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या तरुण नवोदितांची क्षमता ओळखण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी ‘शेफलर इंडिया’च्या सामाजिक विकास उपक्रमाचा एक भाग असलेल्या या प्रोग्रॅमच्या माध्यमातून उत्प्रेरक म्हणून काम करण्यात येते.

प्रोग्रॅममधील विजेत्यांचे अभिनंदन करताना हर्षा कदम म्हणाले, “नावीन्यता आणि विकास यांमुळे एकंदरीत वाढ होत असते. अर्थात, समन्यायी नवोपक्रम ही सर्वसमावेशक वाढीची गुरुकिल्ली आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशा अनेक उत्कट कल्पना पाहता येणे आनंददायी असते. या कल्पनांमधून सामाजिक जडणघडणीवर सकारात्मक परिणाम होत असतो. विकास आणि सर्वांगीण वाढीला चालना देणारी तंत्रज्ञानातील नावीन्यता आपण सामान्यपणे पाहात असतो. शेफलर इंडिया येथे आम्हाला या वस्तुस्थितीची जाणीव आहे आणि म्हणूनच आम्ही या प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे.”

या घोषणेबाबत बोलताना संतनू घोषाल म्हणाले, “आम्ही आपल्या समाजाची समृद्धी आणि प्रगती साधण्यासाठी कटिबद्ध आहोत. भारतभरातील तरुण व उत्कट नवोन्मेषकांच्या अग्रगण्य भावनांचा उपयोग करून सामाजिक व पर्यावरणीय समस्यांमध्ये सुधारणा घडवून आणणे, हा ‘शेफलर इंडिया सोशल इनोव्हेटर फेलोशिप प्रोग्रॅम’चा उद्देश आहे. या फेलोशिप कार्यक्रमासाठी निवड झालेल्या उत्कृष्ट नेत्यांच्या गटाचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. या विजेत्यांनी २१ व्या शतकातील समस्यांवर परिवर्तनात्मक उपाय विकसित करण्यासाठी दृढ कटिबद्धता दर्शविली आहे. त्यातून अधिक समर्थ अशी व्यवस्था, समाज आणि लोक निर्माण होतील.”

मॅगसेसे पुरस्कार विजेते सामाजिक उद्योजक व ‘गुंज’चे संस्थापक अंशु गुप्ता यांनी या कार्यक्रमाचे परीक्षण करताना म्हटले, “या कार्यक्रमाचा एक भाग बनणे हा अत्यंत आनंददायी आणि समृद्ध करणारा अनुभव होता. उत्कटतेने आपल्या कल्पनांचा पाठपुरावा करणाऱ्या सर्व विजेत्यांचे मी अभिनंदन करतो. तसेच, सामाजिक प्रभाव साधणाऱ्या कल्पनांना पुढे आणण्यासाठी हे व्यासपीठ तयार करणाऱ्या ‘बडी4स्टडी’ आणि ‘शेफलर इंडिया’ यांच्या टीम्सचेही मी अभिनंदन करतो. विविध समस्यांचा गाभा समजून घेण्याचा आणि नवीन दृष्टिकोन व उपाय सादर करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण कसा करीत आहेत, हे पाहणे अत्यंत नवलाचे होते.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading