भाजपने राज्यात अस्थिरता माजवण्याचं काम केलं – नाना पटोले
मुंबई : भारतीय जनता पार्टीने राज्यात अस्थिरता माजवण्याचं काम केलं आहे. पण महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तसेच, सरकारला अपक्ष आमदारांचाही पाठिंबा असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेत्यांची आज बैठक पार पडली. त्यानंतर नाना पटोलेंनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यातील राजकारणावर राज्यपालांचं लक्ष आहे. पण राज्यपाल कोणाचं ऐकतात हे वेगळं सांगायची गरज नाही. बंडखोर आमदारांमुळे सरकार अल्पमतात आलेलं नाही. त्यांच्याकडे अजूनही बहुमताचा आकडा झालेला नाही. सर्व आकडे उद्धव ठाकरेंच्या बाजुनेच आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात जर सरकार अल्पमतात आलेलं असेल तर भाजपने पुढे यायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. राज्यात महाभारत घडवून त्यांनी जनतेचं नुकसान केलं आहे, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांच्या वक्तव्याविषयी त्यांना विचारलं असता, नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत यांचं वक्तव्य हे पक्षाचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही. मात्र, महाविकास आघाडी पाच वर्षे पूर्ण करेल असा विश्वास आहे, असं नाना पटोले म्हणाले.
ज्या भाजपने महाराष्ट्रात महाभारत घडवलं, त्यांच्याकडे अजूनही संख्याबळ नाही. भाजपला सत्तेची लालसा पडलेली आहे. ईडीच्या माध्यमातून त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढं सगळं होऊनही भाजप गप्प का बसली आहे, कारण त्यांच्याकडे संख्याबळ नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.