राजकारण आता व्यवसाय झाले आहे; खासदार बारणे यांची खंत
पुणे : ‘राजकारण आता फॅशन आणि व्यवसाय झाला आहे. विचारांची देवाणघेवाण करायची असेल तर वाचनसंस्कृती जपली पाहिजे. कार्यकर्त्यांनी मोबाईल बाजूला ठेवून लोकांशी संवाद साधला पाहिजे. जो जनतेशी संपर्क ठेवेल, तोच लोकप्रतिनिधी निवडून येईल. मी जनतेचा जनसेवक आहे, या पद्धतीने आपण काम करणे गरजेचे आहे’, असे प्रतिपादन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
शिवसेना शहर उपप्रमुख आणि मंडई विद्यापीठ कट्ट्याचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी शनिवारी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना आमंत्रित केले होते. यावेळी श्रीरंग आप्पा बारणे यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. कोरोना काळात नागरिकांना केलेली मदत याविषयी बारणे यांनी माहिती दिली. यावेळी मालुसरे यांनी बारणे यांचा गौरव केला. या कट्ट्यावरती शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, ऋषिकेश बालगुडे, दिनेश शिर्के, हर्षद मालुसरे, संतोष भुतकर, हनुमंत दगडे, सनी गवते, राजेंद्र आबनावे, गणी पठाण आदी उपस्थित होते.