गोपीचंद पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली किड – प्रदीप देशमुख
पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या थराला जाऊन थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी पडळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली विषारी कीड आहे. अशी टीका त्यांनी केली.
पडळकारांनी कांद्याच्या प्रश्नावरून नाशिकमध्ये शरद पवारांवर टीका केली होती.
नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्नावर आंदोलन करत असताना शेतकऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यावेळेस शेतकऱ्यांनी रक्त न सांडता इकडे येऊन शरद पवार यांच्या वर लाथ घाला.असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील. त्यानंतर त्यांना कांद्याचा वास द्या, ते शुद्धीवर आल्यानंतर कांद्याचे दर वाढतील, असे बाळासाहेब म्हणाले होते, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचे पालन करणार का? असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते.
यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी पडळकरांवर टीका केली आहे. गोपीचंद पडळकर ही राज्याच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. जास्तीत जास्त अश्लाघ्य कसे बोलता येईल आणि स्वतः पहिल्यांदा बोललेले रेकॉर्ड पुढच्यावेळी अजून घाणेरडे बोलून कसे मोडता येईल, असा या व्यक्तीचा प्रयत्न असतो. संघाचे आणि भाजपाचे म्हणवणारे हे आमदार कोणत्याही राजकीय, सामाजिक प्रश्नावर न लढता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जास्तीतजास्त कसे अश्लाघ्य बोलता येईल. याची सतत प्रॅक्सिसच करत असतात. अशा प्रकारांची विधानं करून हे भाजपाची आणि स्वतःची लायकी दाखवत असतात. शरद पवारांसारख्या सूर्यावर थुंकल्याने ती थुंकी आपल्या तोंडावर पडेल, हे का पडळकर सारख्यांना कळत नाही, असं ते म्हणाले. तसेच, तुमची अश्लाघ्य बडबड बंद करा. ही बडबड थांबली नाही. तर राष्ट्रवादी पक्ष जसास तसे उत्तर देईल, असा इशारा प्रदीप देशमुख यांनी दिला