मी किरीट सोमय्यांना कोणतही उत्तर देण्यास बांधील नाही – अनिल परब
पुणे : “मी किरीट सोमय्यांना कोणतंही उत्तर देण्यास बांधील नाही. मी त्यांना आजपर्यंत कोणतंही उत्तर दिलेलं नाही. ज्या यंत्रणांकडे तक्रार करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यातील अधिकारी आम्हाला जे प्रश्न विचारत आहेत त्यांची उत्तरं आम्ही उत्तर देत आहोत .असे अनिल परब म्हणाले.
शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने छापेमारी केली. ईडीने मुंबईसह पुणे आणि रत्नागिरी अशा एकूण सात ठिकाणी छापे टाकले होते. अनिल परब यांना दापोलीमधील जमीन विकणाऱ्या विभास साठेंच्या कोथरुडमधील घरावरही छापा टाकण्यात आला होता. विभास साठे यांच्या कोथरुडमधील कार्यालयात छापेमारी करण्यात आली होती. दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी विभास साठेंचा मनसुख हिरेन होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानावर अनिल परब यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल परब म्हणाले ,ही नौटंकी गेल्या वर्षभरापासून सुरु असून त्याला उत्तर देण्यास बांधील नाही. जे काही आरोप असतील ते त्यांनी यंत्रणेकडे करावेत, ते आमची चौकशी करतील. त्यातून सत्य समोर येईल,असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बुद्धीबळ स्पर्धेच्या उद्घाटनावेळी “बुद्धिबळाप्रमाणेच राजकारणातही डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे लागते. एकही चाल चुकली, तर पराभव ठरलेला असतो. आम्हीही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अशाच एका चुकीमुळे पराभूत झालो होतो,” असं म्हटलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले की, “बुद्धिबळ आहे, कोण कसा डाव खेळतं हे शेवटी कळतं. त्यामुळे यावर आता काही बोलणं योग्य राहणार नाही. बघू लढाईत काय होतं.
