चूक नसतानाही काँग्रेसची चूक दाखवण्याची परंपरा सुरूच; नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका
नागपूर : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून परप्रांतीय उमेदवारी देणाऱ्या काँग्रेसवर टीका करणाऱ्या विरोधकांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतित्यूर दिले आहे. काँग्रेसची चूक नसतानाही चूक दाखवण्याची परंपरा सुरू झाली आहे. केंद्रातील आठ वर्षांच्या कमकुवत सरकारने हे देश बरबाद केलं. तसेच या सर्व गोष्टी लपवण्यासाठी काँग्रेसच्या एखाद्या नेत्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ही एक प्रकारची त्यांची मानसिकता आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली.
नाना पटोले म्हणाले की, आमचे काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगडी यांनी उमेदवार अर्ज भरला आहे. तसेच त्यांनी अर्ज भरताना मराठीतून शपथ घेतली आहे. त्यामुळे देशाची एकात्मता आणि त्या विचाराला व भाषेला माननारा उमेदवार आमच्या हायकमांडने आम्हाला दिला आहे. त्यामुळे आम्ही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं आभार व्यक्त करतो.
काँग्रेसमधून नाराजी असल्याचं सांगितलं जातय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नाना पटोले म्हणाले की, निवडणुकीला जास्त दिवस राहिलेले नाहीयेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यादिवशीपासूनचं दिवसा पण स्वप्न बघणारी विरोधक आम्ही पाहिले आहेत. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ ऑगस्टला झेंडा फडकावणाऱ्या लोकांची स्वप्नं राज्यातील जनतेला माहिती आहेत. त्यामुळे ही मॅजिक फिगर लोकांच्या समोर येऊ द्या, असं नाना पटोले म्हणाले.
राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान करावं लागतं. त्यामुळे ही गोष्ट लोकांसमोर येऊ द्या. त्यामुळे ही परंपरा महाराष्ट्रात राहिली आहे. राज्यसभेच्या निवडणुका या बिनविरोध होतात. परंतु विरोधकांचा दावा असेल तर त्याच्यावर आम्हाला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायची नाहीये.
इम्रान प्रतापगडी हे नगमा यांच्यापेक्षा पात्रतेचे नेते आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नाना पटोले म्हणाले की, व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. ही त्यांनी मांडलेलं आहे. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. भाजपमध्ये सुद्धा नाराजी आहे. मात्र, त्यांच्यामध्ये लोकशाही नाहीये, अशी टीका नाना पटोलेंनी भाजपवर केली आहे.