मात्र, 2014 नंतर सरकार बदललं आणि चित्र बदललं -शरद पवार
कोल्हापूर :मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राजकीय विषयांवर चर्चा केली होती.अशातच कोल्हापूरच्या सभेत शरद पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
2014 च्या अगोदर देशाची स्थिती वेगळी होती. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील सरकार होतं. देशासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रितपणाने कष्ट घेतले गेले. मात्र, 2014 नंतर सरकार बदललं आणि चित्र बदललं, असं शरद पवार म्हणाले आहेत.
दिल्लीचं गृहखातं हे भाजपाच्या हातात आहे. अमित शहा यांच्या हातात आहे आणि गृहखात्याची जबाबादरी ज्यांच्यावर आहे, त्यांनी ही देशाची राजधानी एका विचाराने एकसंध राहील, याची खबरदारी घ्यायला हवी होती, असंही पवार म्हणाले आहेत.
तुम्हाला हे सांगू इच्छितो, दिल्लीत काही घडलं तर त्याचा संदेश जगात जातो आणि जगात या देशात अस्थिरता आहे, असा संदेश जातो. सत्ता असताना तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही?, असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, आज हा देश एकसंध ठेवण्याचं आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे, असंही शरद पवार म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या जनतेचे देखील आभार मानले आहेत.