काहीजण जाणीवपूर्वक भावना भडकवण्याचे काम करत आहेत – उपमुख्यमंत्री अजित पवार
सुपे : उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी सुपे येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आले होते, यावेळी ते बोलताना एसटी कामगारांनी शरद पवार यांच्या घरावर केलेल्या आंदोलनावर परखड बोलले . एसटी कर्मचाऱ्यांनी चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका.पण ऐकले नाही. काहीजण जाणीवपूर्वक भावना भडकवण्याचे काम करत आहेत, अशी खंत यावेळी बोलताना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
तसेच यावेळी शेतकऱ्यांना बोलताना ते म्हणाले, जेवढे पाणी आहे तेवढाच ऊस लावा. आम्हालाही काळजी आहे. पण ऊस लावायचा अन् पाणी कमी पडले की ओरड करायची. त्यापेक्षा पाण्याची उपलब्धता बघून ऊस लावा.
कारखाने चालवणे सोपे नाही. भीमा पाटसची काय अवस्था झाली आहे? ऊस आहे, पाणी आहे. पण कारखान्याची अवस्था काय..? तुमचा प्रपंच त्यावर चालतोय. त्यामुळे अडचणींवर मार्ग काढतोय, असे पवार यावेळी म्हणाले आहेत.
त्याचसोबत कोरोनामुळे अडचणींना सामोरे जावे लागले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागले. आता कुठे आपण सावरायला लागलो आहोत. अनेक प्रश्न आहेत. एकमेकांशी चांगले वागा. गैरसमज पसरवू नका. बंधूता, एकात्मता जपा ही साहेबांची शिकवण आहे. संस्थेतून लोकांना मदत व्हावी. राजकारण होवू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
बोलण्याच्या ओघात माणूस विसरून जाऊ शकतो. त्याचा गैरअर्थ काढू नका. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. त्याला बळी पडू नका, असेही आवाहन अजित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.
एसटी कर्मचारी संप तसेच पीएमपीएमएलविषयी अजित पवार म्हणाले, की पीएमपी बस ७०० कोटींच्या तोट्यात आहे. एसटीपेक्षाही कमी तिकिट ठेवले आहे.आता पिंपरी आणि पुणे महानगरपालिकांकडून इलेक्ट्रीक बसेस खरेदी होणार आहेत. सार्वजनिक परिवहन सेवा संबंधित संस्थेला परवडत नाहीत. मात्र इलेक्ट्रीक बसेस सुरू झाल्यावर संबंधित संस्थांनाही फायदा होईल.असे अजित पवार म्हणाले आहेत.