अंथरुण पाहून पाय पसरणारा आजचा अर्थसंकल्प – नाना पटोलेंची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
मुंबई:राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार
यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे.
ऊर्जा विभागाला अर्थखात्याकडून आवश्यक निधी मिळायला हवा, थकबाकी मिळायलाच हवी. देश विकून, कर्ज काढून योजना राबवता येत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी अर्थसंकल्पावर दिली आहे.
नाना पटोले म्हणाले, काही दिवसांपासून कोळशाची टंचाई सुरू आहे. औष्णिक ऊर्जेसाठी निधीची आवश्यकता आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेकदा चर्चा झाली आहे. राज्याच्या अर्थ खात्याकडून ऊर्जा खात्याला मिळणारा निधी अद्यापही मिळाला नाही. ही थकबाकी मिळाली पाहिजे. देश विकून कर्ज काढून योजना राबवता येत नाही. मोठमोठ्या घोषणा करता येत नाहीत याची राज्य सरकारला जाण आहे. आजचा अर्थसंकल्प अंथरुण पाहून पाय पसरणारा आहे.ऊर्जा खात्याच्या मागण्यांविषयी सभागृहात आम्ही मुद्दा उपस्थित करणार आहोत.
नाना पटोले म्हणाले ,ऊर्जाखाते काँग्रेसकडे आहे. यंत्रमाग,कापड गिरण्यांसह विदर्भ, मराठवाड्यातून मिळणारे अनुदानही ऊर्जा खात्याला मिळाले नाही. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला वीज वितरण कंपन्यांना कर्ज न देण्याबाबत सूचना केली आहे. त्याच्या परिणामी कर्ज उपलब्ध होत नाही. राज्य सरकारकडून मिळणारा निधी, अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले होते. असे नाना पटोले म्हणाले.
