भरकटलेल्या समाजाला शिवाजी महाराजांचे विचार तारू शकतात – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर
शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने मराठी शिलेदार पुरस्कार वितरण
पुणे : फर्जंद हा चित्रपट पाहून बाल सुधारणा कारागृहातील आठ जणांनी गुन्हेगारी सोडून छोटे व्यवसाय उभे केले आहेत. अशा सकारात्मक गोष्टी घडताना पाहून समाधान वाटते. चित्रपट माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनसामान्यांमध्ये पोहोचविता येतात, भरकटलेल्या समाजाला छत्रपतींचे विचार तारू शकतात असे मत लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केले.
शिवगर्जना प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मराठी शिलेदार पुरस्कार इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, गिर्यारोहक उमेश झिरपे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष ॲड. गणेश सातपुते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी योगेश खैरे, संतोष पाटील, महेश महाले यावेळी उपस्थित होते. दिग्पाल लांजेकर,उमेश झिरपे यांनी “मी मराठी स्वाक्षरी मराठी” या उपक्रमात सहभाग नोंदविला.
उमेश झिरपे म्हणाले, गिर्यारोहण क्षेत्रात मराठी लोकांचे योगदान मोठ्या प्रमाणात असून गिर्यारोहण विषयी अभ्यासक्रम देखील सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिकवला जातो. मावळ आणि मुळशी या भागाचे गिर्यारोरण क्षेत्रातील योगदान मोठे आहे, असेही त्यांनी सांगितले.
ॲड. गणेश सातपुते म्हणाले, मराठी राजभाषा दिनानिमित्त दरवर्षी मराठी शिलेदार हा पुरस्कार देण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य विविध माध्यमातून जनसामान्यांमध्ये पोहोचविणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे , गिर्यारोहक उमेश झिरपे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनविणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना यंदा या पुरस्काराने गौरविण्यात आले.
