औंध मधील डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह तात्काळ सुरू करा – संभाजी ब्रिगेड
पुणे :मराठा समाज लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर राज्य सरकारने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वस्तीगृहाची निर्मिती केली. पुण्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख (औंध आयटीआय, पुणे) वस्तीगृहाचे उद्घाटन 2018 मध्ये तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते. मुलांसाठी २५० आणि मुलींसाठी ५० आसन क्षमता असणारे हे वस्तीगृह सध्या बंद आहे.
सरकारचा प्रचंड भोंगळ कारभार सुरू असून वस्तीगृहात प्रवेश असणारे मागील वर्षातील विद्यार्थी वारंवार जिल्हाधिकारी व सरकारकडे पाठपुरावा करत असताना सुद्धा जाणीवपूर्वक सरकारच्या निष्क्रिय पणामुळे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह सुरू होत नाही. कोरोना काळातील बिकट परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील ‘मुलांकडे राहिला घर नाही आणि खायला पैसे नाहीत’ अशी परिस्थिती असताना सरकार त्यांचा छळ करत आहे, हेच महाविकास आघाडी सरकारचे निष्क्रियपणाचे लक्षण आहे. विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या मुलाची पुण्यात प्रचंड हेळसांड होत आहे. पुण्यातील बंद केलेली सर्व वस्तीगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू करावी अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व पुणे जिल्हाधिकारी यांना विनंती आहे… अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह व प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू झाले पाहिजे. अन्यथा गुरूवार दि. ३ मार्च २०२२ पासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने विद्यार्थ्यांना घेऊन औंध आयटीआय समोर ‘अमरण उपोषण’ करण्यात येईल. मुळात राज्यामध्ये शाळा, महाविद्यालय सुरू झालेली असताना सुद्धा राज्य सरकार मुलांचे वस्तीगृह सुरू करू नाही, हे दुर्दैवी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह मध्ये पूर्ण वेळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून मुलांना जेवणासाठी सुद्धा उत्तम प्रकारची मेस त्या ठिकाणी सुरू करावी. मागील काळात याच हॉस्टेल मध्ये दोन वर्ष मुलांना पिण्यासाठी पाणी नव्हते. यापेक्षा दुर्दैवी अवस्था काय…? तसेच सदर वसतिगृहासाठी पूर्णवेळ अधिकारी देण्यात यावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे, संदिप लहाने पाटील, विद्यार्थी हर्षवर्धन शिंदे, स्वप्निल चौधरी, स्वप्निल बहीर, जयेश सोनवणे, अभिषेक शिंदे आदी उपस्थित होते.
सुडबुद्धीच्या राजकारणात महाराष्ट्रातील प्रमुख प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, बे-रोजगार तरूण, नोकर भरती… इत्यादी तरुणांचे प्रमुख प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थ्यांवरील होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही.
