मुख्यमंत्री आपला ‘ठाकरी बाणा’ दाखवणार का? – भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी
नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याची भाजपची मागणी
पुणे : आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचा आरोप कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यावर EDने केले आहेत. सध्या ते EDच्या कोठडीत आहेत. यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून याविषयी बोलताना भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी म्हणाले, नवाब यांना मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून मुख्यमंत्री आपला ‘ठाकरी बाणा’ दाखवणार का? असा सवाल गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप हा देशद्रोहाएवढाच गंभीर असल्याने असा ठपका असलेला मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात असणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे ते म्हणाले.
मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुकांवर डोळा ठेवून नवाब यांना अभय देण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकारच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल असा इशाराही भांडारी यांनी दिला. मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी ईडीकडे पुरेसे पुरावे असल्याचे सांगण्यात येत असतानाही मलिक यांना मंत्रिपदावर ठेवण्याच्या दबावापुढे झुकून मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण कणाहीन राजकारणी असल्याचे सिद्ध केले आहे, अशी टीकाही भांडारी यांनी केली.
