कोर्टी ते आवाटी रस्त्याचे काम सुरु करा; अन्यथा आंदोलन करू – अतुल खुपसे-पाटील
करमाळा : कोर्टी ते आवाटी हा रस्ता दळणवळण व वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या रस्त्यावरुन रहदारीचे प्रमाण देखील खुप आहे. परंतु तुटलेल्या रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर हा रस्ता सात दिवसाच्या आत पूर्ण करावा; अन्यथा कार्यालयाच्या समोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा जनशक्तीचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी दिला आहे.
रस्त्यावरुन दळवणवळण करीत असलेली गावे = जिंती-भिलारवाडी-देलवडी-कुंभारगाव-सावडी-पारेवाडी-दिवेगव्हाण-राजुरी-पोंधवडी-कोर्टी-विहाळ-मोरवड- पोंधवडी-कोर्टी-विहाळ-मोरवड- दिवेगव्हाण-राजुरी- पोंधवडी-कोर्टी-विहाळ-मोरवड-वीट- रोशेवाडी. वडगाव(द)-अंजनडोह-करमाळा-पांडे-फिसरे-हिसरे-मिरगव्हाण-अर्जुननगर-सालसे-आळसुंदे-साडे-गोंडरे-नेरले-कोळगाव व आवाटी.
या संदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. त्यात म्हणाले आहे की, या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. एवढेच नाही तर तालुक्याला येणारे विद्यार्थी, बाजारात फळविक्री करणारे, दवाखान्यासाठी येणारे रुग्ण, ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर व ट्रक यांना या रस्त्याने ये-जा करत असताना अडचणींना सामोर जावे लागत आहे. धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून रस्त्यावर पाणीही मारले जात नाही. ज्यामुळे दुचाकीने प्रवास करणाऱ्या व इतर प्रवास्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे व तसेच धुळीने रस्ता दिसत नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहेत.लोकप्रतिनिधीकडून डांबर प्लांटचे उद्घाटन झाले. परंतु अद्यापदेखील कामाला सुरुवात झाली नाही. परिणामी याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे.
सदर रस्त्यावरुन कमलाई साखर कारखाना, भैरवनाथ शुगर विहाळ, मकाई सहकारी साखर कारखाना, बारामतो अंग्रो, अंबालिका, विठ्ठल शुगर म्हैसगाव या कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी
देखील याच रस्त्याचा उपयोग होत असुन रस्ता तुटल्या कारणाने ट्रक, ट्रॅक्टर पल्टी होत आहेत व
वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हा रस्ता फक्त तालुक्यापुरता मर्यादीत नसून पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा रस्ता तसेच मुंबई पुणे ते भुम यासाठी देखील हा मुख्य रस्ता आहे. म्हणून या रस्त्याचे काम सुरु करुन त्वरीत पुर्ण करावे. अन्यथा येत्या १८ फेब्रुवारीला शेतकरी व ग्रामस्थांना घेऊन धरणे आंदोलन करू, असा इशारा अतुल खूपसे पाटील यांनी दिला.
यावेळी युवक जिल्हाप्रमुख बाबासाहेब चव्हाण, राणा महाराज, अक्षय देवडकर, रघुनाथ कांबळे, रामराजे डोलारे, संभाजी शिंदे, शरद एकाड, बालाजी तरंगे, जोतिराम तरंगे,अविनाश वाघमारे, अनिकेत वाघमारे,पिनू नरसाळे आदी उपस्थित होते.
