‘मेरी आवाज ही पहचान हे .. ‘;चिमुकली ‘हेमा’ ते ‘भारतरत्न’ लता दिदींचा प्रेरणा देणारा जीवन प्रवास …
मुंबई : लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथील मराठी भाषिक गोमंतक कुटुंबात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते. त्यामुळे लताजींना संगीताचा वारसा लहानपणापासूनच मिळाला. त्यांना लहानपणी “हेमा” या नावाने हाक मारली जायची, पण नंतर वडिलांनी “भाव बंधन” या नाटकाने प्रेरित होऊन त्यांचे नाव बदलून ‘लता’ असे ठेवले.

लता मंगेशकरांच्या कारकीर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये वयाच्या 13 वर्षी झाली. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर कुटूंबयची संपूर्ण जबाबदारी लता दिदीवर पडली. यावेळी अभिनयात रस नसताना देखील त्यांनी काही चित्रपटात अभिनय आणि पार्श्वगायन हे दोन्ही केले. यामध्ये ‘पहिली मंगळागौर’,गजाभाऊ, चिमुकला संसार, छत्रपती शिवाजी आदी चित्रपटांचा उल्लेख करता यईल.
मात्र नंतरच्या काळात 1948 नंतर त्यांनी पूर्णवेळ पार्श्वगायन करायला सुरूवात केली. त्यावेळी शमशाद बेगम, नुरजहा, अमीरबाई कर्नाटकी यांसारख्या दिग्गज गायीकांचा काळ होता. त्या स्पर्धेत सुद्धा लता दीदींनी आपल्या आवाजाने वेगळा ठसा उमटवला. तब्बल सहा दशक त्यांनी आपल्या आवाजाच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. संगीत क्षेत्रातील असंख्य गाणी त्यांच्या आवाजाने अजरामर झाली. ऐ मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी, वंदे मातर, लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो (साधना), प्यार किया तो डरना क्या (मुगल-ए-आजम), आप की नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे (अनपढ़), तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं (मासूम), आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है (गाइड) ही त्या पैकीच काही.

लता मंगेशकर यांना समस्त संगीत क्षेत्रात ‘दीदी’ या नावाने ओळखले जात. त्यांच्या सोबत काम करणे म्हणजे कोणत्या उपादहीपेक्षा कमी नव्हते. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. लता मंगेशकर यांना 2001 साली ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

लता दीदींच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा हरपला आहे. पण ‘मेरी आवाज ही पहचान हे ..’ या त्यांच्याच गाण्याच्या ओळी प्रमाणे लता दीदी या त्यांच्या गाण्याने आवल्या अखंड स्मरणात राहतील.
