या सरकारने महाराष्ट्राचा सत्यानाश करायचे ठरवले आहे का? – चंद्रकांत पाटील
पुणे : सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये ‘शेल्फ इन शॉप’ या पद्धतीने वाईनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले,राज्य सरकारने सुपर मार्केट व मॉल मध्ये वाईनची विक्री करण्याचा निर्णय घेतला. हा एक दुर्दैवी निर्णय आहे. सरकारने नुसती दारू विक्री करायला ठेवू नये, तिथे लोकांना बसून पिता पण येईल अशी व्यवस्था करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. तसेच ‘या सरकारने महाराष्ट्राचा सत्यानाश करायचे ठरवले आहे का? असा सवालही उपस्थित केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, टाळे बंदी च्या काळात सरकारने किराणा मालाचे दुकान बंद केली होती. पण दारूच्या दुकानांना परवानगी दिली होती. आज प्रसिद्ध लेखक अनिल अवचट यांचे दुःखद निधन झाले त्यांनी व्यसनमुक्तीसाठी काम केले होते. या सरकारला तरुण पिढी व्यसनात ठेवायची आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर विचारला आहे.
