कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध चालतील, पण लॉकडाऊन नको- चंद्रकांत पाटील
पिंपरी : गेली दोन वर्षे कोरोना महासाथीमुळे बिघडलेले अर्थकारण आता रुळावर यायला लागले असताना राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू करू नये. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लावले तर चालतील पण लॉकडाऊन नको, अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले की, गेली दोन वर्षे विद्यार्थी, खेळाडू, व्यापारी, उद्योजक अशा विविध घटकांनी कोरोनामुळे खूप नुकसान सहन केले. त्यामुळे राज्य सरकारने हवे तर कडक निर्बंध लावावेत पण सर्व काही बंद करण्याची भूमिका घेवू नये. तसेच कोरोनाचे स्वरुप आता भयानक नाही आणि ही साथ संपण्याची शक्यता आहे, हे तज्ञांचे मतही सरकारने ध्यानात घ्यावे.
शिवसेनेला हिंदुत्वाकडे जावेच लागेल
एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, शिवसेनेतील अस्वस्थता हळुहळू बाहेर पडू लागली आहे. काही शिवसैनिक खासगीत बोलतात तर काही नेते उघड बोलतात. शिवसेना किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खऱ्या शिवसैनिकांना फार काळ दाबून ठेऊ शकणार नाहीत. शिवसेनेला खऱ्या हिंदुत्वाकडे जावेच लागेल. शिवसेनेसोबत भाजपाची युती बाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राजकारणात कधीही काही होऊ शकते, पण त्याबद्दल सांगता येत नाही. पण आपण युतीबद्दल काही बोलणार नाही. तसे बोलले की, लगेच शिवसेनेच्या मुखपत्रातून आपल्यावर सत्ता गेल्यामुळे झोप लागत नाही, अशी टीका होते. प्रत्यक्षात आपल्याला शांत झोप लागते, असा टोला त्यांनी हाणला.
सिंधुताई सपकाळ यांना भाजपातर्फे श्रद्धांजली
चंद्रकांत पाटील म्हणाले की, सिंधुताई या अनाथांच्या माय होत्या. त्यांनी हजारो अनाथ मुला – मुलींचा सांभाळ केला. त्यांनी आभाळाएवढे कार्य केले पण त्यांना त्याचा अहंकार नव्हता. सिंधुताईंच्या कार्याचे स्वरूप व्यापक आहे. हे कार्य पुढे चालू राहण्यासाठी भाजपा मदत करेल. भाजपाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय अठरा वर्षे पूर्ण केलेल्या अनाथ मुलांसाठी तर्पण या संस्थेच्या माध्यमातून यापूर्वीच काम करत आहेत.
