एसटी महामंडळाचे विलीनीकरण डोक्यातून काढून टाका – अजित पवार
मुंबई : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या दीड महिन्या पासून आंदोलन करीत आहेत. मात्र, एसटी महामंडळाचे शासनात विलिनीतरण शक्य नाही, असे म्हणत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कामगारांच्या संपावरील राज्य सरकारची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.
आज विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीचा चेंडू हायकोर्टात आहे, हायकोर्टाच्या निर्देशावरुन विलिनीकरणाची शक्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन झालेली आहे. त्या समितीने आपला अभ्यास सुरु केलेला आहे, त्या समितीने अभ्यासासाठी मुदत वाढ मागितली. समितीचा अहवाल येईल तेव्हा येईल पण एसटी कामगार-कर्मचाऱ्याचं शासनात विलिनीकरण शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज एका महामंडळाचे विलिनीकरण केले तर उद्या अनेक महामंडळाकडून विलिनीकरणाची मागणी पुढे येईल. तसेच राज्यातल्या एसटी कामगारांनी आपला मुंबईतील गिरणी कामगार होऊ देऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मुंबईतील गिरणी कामगारांचा संप तांत्रिकदृष्ट्या अजूनही मागे घेतलेला नाही. या संपामुळे मुंबईतला गिरणी कामगार उध्वस्त झाला, देशोधडीला लागला. त्या प्रमाणे आपल्याला एसटी कर्मचाऱ्यांचे होवू द्यायचे नाही, असेही अजित पवार म्हणाले.
