Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

संविधानाने जगण्याचे भान दिले – डॉ. कुमार सप्तर्षी

पुणेः- संविधान अस्तित्वात येण्याच्या आधी भारतात राजेशाही होती. त्यामुळे लहरी कायदा अस्तित्वात होता. परंतु, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, संविधान अस्तित्वात आल्यानंतर सर्वांना समान अधिकार मिळाले. स्त्री-पुरूष, गरिब-श्रीमंत आदी सर्व भेदांच्या श्रृंखला गळून पडल्या. भारतीयत्व रूजत जाऊन सगळ्यांना जगण्याचे भान आले, असे मत महात्मा गांधी स्मारक निधी गांधी भवनचे अध्यक्ष डाॅ.कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि संविधान दिनानिमित्ताने संवाद पुणे आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिलेल्या 75 संस्थांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी डॉ. सप्तर्षी बोलत होते. महात्मा गांधीचे पुस्तक, स्मृती छायाचित्र, गांधीचे छायाचित्र असलेला मग, खादीची शबनम अशा भेटवस्तू देऊन हा सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोय़ल, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, महाराष्ट्र कला प्रसारणी संभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले की, भारतीय आधुनिकतेचा ध्यास धरत वाटचाल करीत आहेत. परंतु, इथल्या समाज आणि कुटुंब व्यवस्थेमुळे हा सापशिडीचा खेळ ठरत आहे. वैचारिक प्रगतीच्या एका उच्च टप्प्यावर पोहोचल्यानंतर सापशिडीतील हा साप आपल्याला गिळंकृत करून परत पूर्वपदावर आणूनठेवत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जी राजकीय व्यवस्था आणि चौकट अपेक्षित होती, ती दिसून येत नाही. अलीकडील सर्व राजकीय पक्ष म्हणजे केवळ निवडणूक राबविणारी यंत्रणा असे झालेले आहेत. कुठलाही राजकीय पक्ष कोणत्याही विचारसरणीचा असला तरी आपल्या विचारसरणीच्या जोरावर देश कसा बांधला जाईल, देश प्रगतीपथावर कसा जाईल याबाबत कार्यशाळा आणि चर्चासत्रही होत नाहीत. राजकीय पक्षांनी ही जबाबदारी झटकल्यामुळे ओघाने ही जबाबदारी जनतेवर आल्याने म्हणून संविधानदिन साजरे करावे लागतात. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर हळुहळू राजकीय पक्ष नामशेष होत चालले आहेत. जातीच्याच कुंपणावर अडकवून ठेवल्याने जनता गरूड होऊन अवकाशात झेप घेण्या ऐवजी कोंबडी होऊन जागच्या जागी उडण्याचा निष्फळ प्रयत्न करीत आहे. कुठल्याही देशाच्या जडणघडणीत देशाची संस्थात्मक बांधणी आवश्यक असते. भारताची प्रगल्भ लोकशाही व्यवस्था पाहता जगाला आजही आश्चर्य वाटते. परंतु, आपल्या देशाची संस्थात्मक बांधणी ही देशाच्या लोकशाहीचा गाभा आहे.

यावेळी बोलताना डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, आज ज्या संस्थांचा सत्कार करण्यात आला, तो त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून करण्यात आला आहे. पुणे शहरात संस्थात्मक जाळे विणले गेले आहे. सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांना या संस्था म्हणजे प्रत्यक्ष कार्य प्रयोगशाळा आहेत. पुस्तकांच्या परीघाबाहेर काय चालले आहे, हे या संस्थांमधून जाणून घेता येते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची नाळ समाजाशी जोडली जाण्याकरीता विद्यापीठाने अशा 400-500 सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार केलेले आहेत.

कृष्णकुमार गोयल यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले. संदिप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन ईटकर यांनी आभार मानले. यानिमित्त यावेळी माॅं तुझे सलाम हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading