Wednesday, May 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

वर्ल्ड एक्स्पो दुबई येथे १५ हजार कोटींचे सामंजस्य करार

मुंबई  : वर्ल्ड एक्स्पो, दुबई या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या परिषदेत २५ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आलेली असून रु. १५,२६० कोटींची गुंतवणूक राज्यात होणार आहे, या माध्यमातून दहा हजारापेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.

दि. २० नोव्हेंबर रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या सामंजस्य करारात जापान, सिंगापूर, स्वीडन कोरिया जर्मनी इटली व भारत या देशांच्या कंपन्यांनी वाहन व वाहन घटक, लॉजिस्टिक्स, प्राणवायू उत्पादन, ईव्ही, टेक्सटाईल, डेटा सेंटर, औषध निर्माण, जैवइंधन व तेल आणि वायू ई. विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. यासह आर्थिक आणि औद्योगिक सहकार्यासाठी आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशनसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

याप्रसंगी अपर मुख्य सचिव (उद्योग)  बलदेव सिंग, आयुक्त (उद्योग), हर्षदीप कांबळे, एमआईडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. पी. अनबलगन, सह.मुख्य कार्यकारी अधिकारी, ए. एस. आर. रंगा नाईक व महाव्यवस्थापक (पणन व जनसंपर्क)  अभिजित घोरपडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

दि. ०१ ऑक्टोबर, २०२१ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधी मध्ये दुबई (यूएई) येथे वर्ल्ड एक्स्पो या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनामध्ये १९० देश सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील उद्योजक/गुंतवणूकदार, शासकीय विभाग सहभागी झाले आहेत.

या प्रदर्शनात असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन दि. १९  नोव्हेंबर २०२१ रोजी मा. मंत्री (उद्योग), श्री. सुभाष देसाई  यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading