Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

संशोधकाकडे निर्भयता आवश्यक : डॉ. आनंद हर्डीकर

पुणे : संशोधनातून गवसलेले सत्य समाजाला न मानवणारे असले तरी ते मांडण्यासाठी संशोधकाकडे निर्भयता असणे आवश्यक आहे,असे मत प्रसिद्ध साहित्यिक डॉ. आनंद हर्डीकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, दरवर्षी जुन्या पिढीतील ख्यातनाम साहित्यिक आणि ग्रंथप्रसार  चळवळीचे अध्वर्यू कृष्ण मुकुंद उजळंबकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट संशोधनपर पुस्तकासाठी पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. या समारंभाला साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कै. कृष्ण मुकुंद यांच्या कन्या नलिनी गुजराती हे उपस्थित होते.

२०२० सालचा हा पुरस्कार ‘रामदासी ज्ञानोपासना आणि पंचीकरण’ या ग्रंथासाठी मनीषा बाठे यांना तर २०२१ चा हा पुरस्कार ‘गव्यम्’ या गायींविषयीच्या ग्रंथासाठी डाॕ. आमोद साने यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रुपये ११०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्कारांच्या निवड समितीमधे साहित्यिक प्रियांका कर्णिक आणि नीता कुलकर्णी यांनी काम पहिले.

पुरस्काराच्या मानकरी मनीषा बाठे आणि डाॕ. आमोद साने यांनी त्यांच्या संशोधनामागची भूमिका आणि प्रयत्नांविषयी सांगितलं. पुरस्काराच्या देणगीदार नलिनी गुजराथी यांनी कै.कृष्ण मुकुंद यांच्या कार्याचा आढावा घेतला. मसापचे कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले, कोषाध्यक्ष सुनिता राजे पवार यांनी आभार मानले. कार्यवाह बंडा जोशी यांनी या समारंभाचे सूत्रसंचालन केले. या समारंभाला कै. कृष्ण मुकुंद यांचे कुटुंबीय जामात मोहन गुजराती, चिरंजीव मुकुंद आणि सुधीर उजळंबकर तसेच मसापचे कार्यवाह कवी दीपक करंदीकर, उद्धव कानडे, वि. दा. पिंगळे, शिरीष चिटणीस, माधव राजगुरू, प्रमोद आडकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading