शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारचा निषेध म्हणुन उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा -चंद्रशेखर घाडगे
पुणे:कृषी कायद्याविरोधात १० महिन्यांपासून आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवून त्यांना चिरडून टाकल्याची ह्दयद्रावक घटना उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी या ठिकाणी घडली.केंद्रिय मंत्र्याच्या मुलाचा यामधे सहभाग होता व सध्या तो फरार आहे अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे.परंतु मानवी क्रौर्य इतके का वाढले आणि इतकी अमानुषता मनुष्याच्या मेंदूत कशी निर्माण होते ही मन सुन्न करणारी अतिशय गंभीर बाब आहे.माणसाला किड्यामुंग्यांपेक्षाही हलक्या प्रतीचे समजून त्यांना जर इतकी क्रुरतेची वागणूक दिली जात असेल तर हे अराजकतेचे व अमानवीयतेचे लक्षण आहे.त्याचा सर्व स्तरातून निषेध तर झालाच पाहिजे,परंतु अशा प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई सुध्दा होणे अगत्याचे आहे.तरच कुठेतरी अशा अमानुष घटनांना आळा बसेल.
लोकशाहीमधे जनतेला संवैधानिक मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे.परंतु मागील काही वर्षात आंदोलन करणारे,मोर्चे काढणारे,निषेध करणारे,उपोषण करणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल कुत्सित वातावरण देशात निर्माण केले गेले आहे. त्यांना देशद्रोही,समाजद्रोही, तसेच सामाजिक काम करणाऱ्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून आणि पेड बातम्या लावून नियोजनपूर्वक बदनाम करण्यात येत आहे.
ह्या सर्वाचा निषेध म्हणुन आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ११ ऑक्टोबर रोजी च्या महाराष्ट्र बंद ला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या आदेशानुसार संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा वतीने जाहीर पाठिंबा आहे असे संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी सांगितले, आज लोणीकंद येथे सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिनीस प्रदीप कंद यांनी संबोधित केले,यावेळी शिवसेना, संभाजी ब्रिगेड, आय काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
