आर्थिक साक्षरतेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल – उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : आर्थिक साक्षरतेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जिल्हा परिषद पुणे, जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी आयुष प्रसाद,पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँक पुणेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक शालिनी कडू आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, आज सर्वांना आर्थिक साक्षरतेची गरज आहे. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील महिला, युवक, शेतकरी यांना बचतीचे महत्व, बँक सुरक्षा, विमा योजना, पीक कर्ज सुविधा याबाबत माहिती मिळेल. ग्रामीण भागात बँक व नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधला जावा याकरीता ही मोहिम राबवली जात आहे. आर्थिक साक्षरतेमुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. आजच्या युगात प्रत्येकाने आर्थिक व्यवहारासंदर्भात जागरूक राहणे गरजेचे असल्याने ही मोहीम उपयुक्त ठरेल. मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समुहाला बचतीचे महत्व कळेल आणि आर्थिक साक्षरता मोहिमेमूळे मुद्रा योजनेसारख्या योजनांचा लाभ घेणेदेखील सोपे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार सुळे म्हणाल्या, एक आगळा वेगळा उपक्रम पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत असून सामान्य नागरिकांच्या आर्थिक साक्षरतेसाठी तो सफल होणे गरजेचे आहे. आर्थिक साक्षरता मोहिम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, बचत गटांच्या महिला, लघू उद्योजक यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे अधिकारी, महिला बचत गट सर्वानी व्यवस्थित काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सिल्वर ज्युबिली रुग्णालयातील ऑक्सिजन प्लान्टचे उद्घाटन
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतर्फे सीएसआर फंडातून सिल्वर ज्युबिली रुग्णालयास देण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे , एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अनिल बागल उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे उपस्थित होते.
