Wednesday, June 17, 2026
BLOGLatest News

‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय ?

शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नाविषयी अनेक संघटनांचा उदय झाला कालानुरूप त्या संघटना दिसेनाशा झाल्या मात्र सोलापूर जिल्ह्याच्या रणांगणावर उदयास आलेली जनशक्ती शेतकरी संघटना सध्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कष्टकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडताना दिसत आहे.

शेतकरी कष्टकऱ्यांची घुसमट आजपर्यंत होत राहिलेली आहे. प्रस्थापितांच्या अन्यायकारक धोरणामुळे या वर्गाला नेहमीच संघर्ष करावा लागत आलेला आहे. हा संघर्ष करत असताना अनेक संघटना , पक्ष जन्माला आल्या परंतु कालानुरूप त्या शक्तिशाली व्यवस्थेच्या विरोधात कमजोर होत गेल्या.प्रस्थापितांच्या विरोधात लढताना राजकीय असुयेपोटी त्यांची धोरणे गलिच्छ होत गेली. शरद जोशी नंतर शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना वाली राहिला नाही असे आजही अनेक जण खाजगीत बोलताना दिसतात. राजू शेट्टींनी अवघ्या महाराष्ट्रात वादळ उभा केले मात्र त्यांची हवा पूर्वीसारखी राहिलेली दिसत नाही.अशातच सोलापूर जिल्ह्यामध्ये उदयास आलेल्या अतुल खूपसे पाटील यांच्या जनशक्ती संघटनेच्या प्रभावशाली ध्येय धोरणामुळे व आक्रमक आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर या संघटनेची सध्या चर्चा होताना दिसत आहे.

अनेक प्रश्नांना अगदी अल्पावधीत या संघटनेने न्याय मिळवून दिलेला दिसत आहे. मच्छीमारांचे प्रश्न, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, एफआरपी संदर्भातील प्रश्न आणि आता सुरू असलेले वाहतुकीबद्दलचे प्रश्न या संघटनेने रडारवर घेतले आणि ते सोडून दाखवण्याचा त्यांचा अचूक प्रयत्न दिसत आहे. नुकताच  पंढरपूर येथील या संघटनेचा मोर्चा लक्षवेधक ठरला. त्यामुळे एक आक्रमक संघटना गवसल्याची भावना सध्या शेतकरी कष्टकरी बांधवातून व्यक्त होताना दिसत आहे.

२०११ नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना ऊसदराचा न्याय मिळवून दिला होता. पण तद्नंतरच्या काळात सदाभाऊ खोत संघटनेपासून दूर झाल्याने या संघटनेची जिल्ह्यातील ताकद घटल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यामध्ये जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना आंदोलनाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.ही संघटना विविध प्रश्न हाती घेत असताना फक्त आंदोलने मोर्चे काढून थांबताना दिसत नाही तर त्या प्रश्नांचा पाठपुरावा करून सोडविण्यावर या संघटनेचा भर दिसत आहे.अचूक प्रश्नांना हात घालत योग्य रणनीती आखत प्रत्येक प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन तो प्रश्न निकाली काढण्यात या संघटनेचा जोर दिसत आहे.त्यामुळे अल्पावधीत जनशक्ती संघटनेने लोकांच्या मनावर राज्य निर्माण केले असून या संघटनेचा जोर आणि ताकद वाढताना दिसत आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading