Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

पुणे : सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.                   

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान ‘पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या उपाध्यक्षा प्रा. मेधा कुलकर्णी, नगरसेवक जयंत भावे आणि सायकलपटू उपस्थितीत होते.

सायकल रॅलीचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करून राज्यपाल कोश्यारी म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देश विदेशातील नागरिकांनी प्रतिसाद देत योग दिवस साजरा केला. सायकलचा दैनंदिन जीवनात वापर निरामय जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरण्यासोबत पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लागतो.राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते ट्रायथलेट कौस्तुभ राडकर,सायकलपटू सुनीता नाडगीर, एकादशी कोल्हटकर, निरुपमा भावे,

जुगल राठी, ट्रायथलेट आणि ट्रेकर निलेश मिसाळ, योग प्रशिक्षक आरती चव्हाण, आयर्नमॅन मेघ ठकार आणि आयोजकांचा सत्कार करण्यात आला.

प्रस्ताविकात प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, पुणे हे सायकलिंचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात मोठ्या प्रमाणात सायकल प्रेमी आहेत. पुणे शहर पर्यावरणपूरक व्हावे, शहराचा शाश्वत विकास व्हावा, महिला सुरक्षित रहाव्यात, या प्रेरणेने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading