Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRA

भौगोलिक मानांकनाच्या माध्यमातून कृषिक्षेत्रात नव्या युगाचा आरंभ होईल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई  : बौद्धिक संपदा व भौगोलिक मानांकन शेतकऱ्यांकरिता महत्त्वाचे विषय असून याबाबत शेतकऱ्यांत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. भौगोलिक मानांकनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळेल तर ग्राहकांना अस्सल वस्तू व उत्पादने खरेदी करता येतील. यादृष्टीने बौद्धिक संपदा व भौगोलिक मानांकनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या मातृभाषेत पोहोचवणे अतिशय आवश्यक असून त्यातून कृषिक्षेत्रात नव्या युगाचा आरंभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

बौद्धिक संपदा व भौगोलिक मानांकन या क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या प्रा. गणेश हिंगमिरे यांच्या ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स’ या इंग्रजी, व ‘जीआय मानांकन’ या मराठी पुस्तकाचे तसेच डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी प्रगत असून देशातील शेतकरी येथील शेतीतील नवनवे प्रयोग पाहण्यास येत असतात. शेती हा भारताचा प्राण असून राज्यातील शेतकऱ्यांनी प्रगती केली तर देशातील शेतकरी त्यांचे अनुकरण करतील व त्यातून देशाची प्रगती होईल शेतकऱ्यांच्या घरोघरी भौगोलिक मानांकनाचे उत्कृष्ट ज्ञान पोहोचविणारे हिंगमिरे जीआय क्रांतीचे आरंभकर्ता असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

बौद्धिक संपदा, पेटंट व ट्रेडमार्क हे विषय जपानमध्ये सातव्या इयत्तेत शिकविले जातात. युरोपप्रमाणे आर्थिक प्रगती साधायची असेल तर हे विषय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे लागतील असे लेखक गणेश हिंगमिरे यांनी सांगितले.

यावेळी राज्यातील विविध विभागातून आलेल्या शेतकऱ्यांनी राज्यपालांना आपापली जीआय मानांकित कृषी उत्पादने भेट दिली. कार्यक्रमाला कर्नल (नि.) गिरीजा शंकर मुंगली, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष सुधाकर आव्हाड,  प्रबोध उद्योगाचे संचालक रामभाऊ डिंबळे, रश्मी हिंगमिरे व गणेश हिंगमिरे यांच्या आई उपस्थित होत्या. बुकगंगाच्या सुप्रिया लिमये यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading